१४.६.१५

नव्वदीनंतरचे सहा नाटककार (अनुज देशपांडे लिखित)

आज मराठी नाटक करणाऱ्या रंगकर्मींना तेंडूलकर-एलकुंचवार-आळेकर या नाट्यलेखक त्रयीच्या नाटकांबद्दल बरीच माहिती असते. पण या तीन लेखकांचा काळ साधारण नव्वदपर्यंतच होता. त्यानंतर मराठीत कोण महत्वाचे नाटककार झाले, नव्वदीनंतरचं बदलतं जागतिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यक्तिगत वास्तव कुठल्या नाटकातून पुढे आलं असं विचारलं तर कित्येकांना सांगता येणार नाही कारण त्याबद्दल पुरेशी चर्चा, समीक्षा झालेली नाही. पण नुकतंच ललित कला केंद्राच्या वतीने पुणे विद्यापीठात नव्वदी नंतरच्या सहा नाटककारांवर एक ३ दिवसीय चर्चासत्र झालं. यातील नाटककार होते – जयंत पवार, संजय पवार, शफाअत खान, प्रेमानंद गज्वी, अजित दळवी आणि प्रशांत दळवी.
       आता हि नावं ऐकून काहींना असं म्हणावंसं वाटेल – अरे हो खरच कि ! यांची अगदी मोजकी नाटकं आम्ही पाहिलीयेत ! पण तेही खरंच आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणानंतर जेव्हा माध्यमांची संख्या झपाट्याने वाढली, टीव्ही वरची channels  आणि कार्यक्रम वाढले, सिनेमा चा व्यवसाय वाढत गेला आणि या सगळ्या गोष्टींची व्याप्ती जेव्हा अगदी मध्यमवर्गापर्यंत पाझरत गेली तेव्हा आपसूकच लोकांनी नाटकाकडे पाठ फिरवली असणार. हीच गोष्ट नाटक करणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा उलट्या पद्धतीने कारणीभूत ठरली असणार. पण अशाही अवघड काळात मकरंद साठे, अतुल पेठे, चेतन दातार, हे सहा नाटककार, राजीव नाईक, चंद्रकांत कुलकर्णी आणि आणखीन सुद्धा अनेक मान्यवर न डगमगता सातत्याने वसा घेऊन समांतर नाटक करत राहिले असले तरी त्यांच्या कामाची पुरेशी ( आधुनिक मराठी नाटकाच्या तुलनेत ) दखल घेतली गेली नाही. हे विधान थोडं धाडसाचं ठरेलहि कदाचित पण त्यात तथ्य आहे हेही खरंच.
          तर – पुण्यातल्या थियेटर अकादमी ने ८५-८७ मध्ये नवीन लेखकांसाठी नाट्यलेखनाची एक कार्यशाळा घेतली. तेव्हा त्यामध्ये हे सहा नाटककार आणि मकरंद साठे, अतुल पेठे पहिल्यांदा सहभागी झाले. त्या कार्यशाळेनंतर मग खऱ्या अर्थाने त्यांचा लेखनाचा प्रवास सुरु झाला. त्यापूर्वी यातील काहींनी एकांकिका हि लिहिल्या होत्याच. पण या कार्यशाळेनंतर ते नावारूपास आले असं म्हणता येईल.
     पण खरंच गांभीर्याने पहायचं तर नेमकं काय वेगळं होतं या नाटककारांच्या नाटकात आणि त्यामागच्या परिस्थितीत ? सर्वात महत्वाची गोष्ट, जी अनेक अभ्यासकांना सुद्धा जाणवते ती हि कि या सर्व लेखकांच्या लेखनामधील समान दुवा काय असेल तर तो म्हणजे – बदलत्या सामाजिक परिस्थितीचे स्पष्ट भान आणि त्याही पुढे जाऊन त्याबद्दल स्वतःची असणारी एक आग्रही आणि कणखर सामाजिक राजकीय भूमिका. शफाअत खानांनी त्या काळचा हिंदू-मुस्लीम वाद, दंगली,  मूलतत्ववाद अगदी जवळून पाहिला आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी नाटकातून सरधोपट पद्धती टाळून विसंगतीचं, समाजाचं absurd, विडंबनात्मक चित्र उभं केलं. शोभायात्रा, राहिले दूर घर माझे, पोपटपंची, गांधी आडवा येतो, किस्से, भूमितीचा फार्स, पोलिसनामा, मुंबईचे कावळे हि त्यांची नाटके. जयंत पवारांनी आपल्या सुरुवातीच्या नाटकातून गिरणी कामगारांचे भयंकर वास्तव फार थेटपणे मांडले. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, वंश, माझं घर, नटरंग, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, चंदूच्या लग्नाची गोष्ट हि त्यांची नाटकं. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या त्यांच्या कथासंग्रहाला मागच्या वर्षी साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला. संजय पवार यांनी “कोण म्हणत टक्का दिला ?” या नाटकातून दलितांचे, शोषितांचे, त्यांच्या आरक्षणामागील राजकारणाचे प्रश्न थेट मुख्य प्रवाहात आणले. सातत्याने प्रस्थापित सवर्णांच्या वर्चस्वाशी ते विद्रोह करीत राहिले. पण या व्यतिरिक्त ठष्ट सारखं विवाहसंस्थेवर हल्ला करणारं नाटक सुद्धा त्यांनी लिहिलं. “दोन अंकी नाटक”, “गायीच्या शापाने”, “ए.के. ४७”, “आम्ही जातो अमुच्या गावा” हि त्यांची इतर काही नाटकं. “ दलितांचे प्रश्न मांडायचे, त्यांच्या अत्याचारांविरोधात, सवर्णांच्या वर्चास्वाविरोधात आवाज उठवायचा हाच माझा हेतू होता आणि त्यासाठी मी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही किंबहुना मी इतरही अनेक विषयावर नाटकं लिहिली पण मला एकाच दलित नाटकाच्या आधारावर ‘दलित नाटककार’ म्हणलं जातं. आपण अशी विभागणी कधी थांबवणार ?’’ असं पवार आपल्या मनोगतात अगदी तळमळीने म्हणाले. प्रशांत दळवींनी चारचौघी या नाटकातून त्या काळच्या स्त्रीच्या स्वातंत्र्याचा, तिच्या बदललेल्या भावविश्वाचा शोध घेतला. या चर्चासत्रात विशेष करून सेलिब्रेशन, चारचौघी, चाहूल, दगड का माती या नाटकांविषयी निबंध सादर झाले. तसच प्रेमानंद गज्वींच्या घोटभर पाणी, तनमाजोरी आणि अजित दळवींच्या ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘शतखंड’, ‘आपल्या बापाचं काय जातं’ या नाटकांवर चर्चा झाली.

      पहिल्या दिवशी प्रस्तावना मांडताना आशुतोष पोतदारांनी मात्र एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला तो असा कि – या नव्वदीनंतरच्या सहा नाटककारांच्या कामाकडे आणि एकूणच त्यांच्या जीवनदृष्टीकडे समीक्षेच्या अथवा संदर्भाच्या अर्थाने बघताना तेंडूलकरी-आळेकरी-एलकुंचवारी आणि त्यामुळे येणारी मराठी नाटकाची एक मर्यादित ब्राम्हणी-मध्यमवर्गीय चौकट मोडावी लागेल आणि विशिष्टपणे त्या काळचे आणि या लेखकांनी अनुभवलेल्या सामाजिक-व्यक्तिगत अस्थिर वास्तवा वर आधारित असे मापदंड तयार करावे लागतील तरच काही नव्या गोष्टी हाती लागू शकतील आणि मराठी नाटक पुढे जाईल. याचं कारण असं कि ज्या प्रमाणात या सहा लेखकांनी जातीय-धार्मिक-लैंगिक-आर्थिक शोषण, विषमता आणि विद्वेष अनुभवला आणि थेटपणे आपल्या नाटकातून मांडला तसा यापूर्वी तरी मराठी नाटकात दिसला नव्हता. आणि केवळ नाटक लिहूनच ते थांबले नाहीत तर तत्कालीन सामाजिक चळवळीशी आणि पत्रकारितेशी सुद्धा जोडले गेले. आणि हि गोष्ट अजिबातच बेदखल करून चालणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा