१४.६.१५

कथेचं नाटक करताना..

काही महिन्यांपूर्वी गिरीश कर्नाडांच्या एका व्याख्यानाला गेलो होतो. नाटक कसे लिहावे असा साधारण विषय होता. बोलता बोलता त्यांनी त्यांच्या अनेक नाटकांची उदाहरणे दिली, मुख्यतः 'ययाती' चे नाट्यरुपांतर त्यांनी कसे केले यावर ते बोलले. ते ऐकून मी केलेल्या नाट्यरुपांतरांची आठवण झाली. कर्नाडांची आणि माझी तुलना अजिबातच होऊ शकत नाही. माझाही तसा कोणताही गैरसमज नाही. पण स्वतःच्या कामाविषयी मी जास्ती अधिकाराने बोलू शकेन म्हणून माझ्या नाटकांची उदाहरणे देऊन बोलेन, बाकी काही नाही.

मी मुख्यतः कथांची नाट्यरूपांतरं केली आहेत. 'रारंगढांग' या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचे एका ध्वनीपुस्तकात (Audio book) रुपांतर करण्यासाठी संहिता लिहिली. आणि आपल्या पारंपारिक पाच अंकी संगीत नाटकांचे दोन अंकात संकलन केले. त्यामध्येही माझ्यातल्या लेखकाचा कस लागला होता. पण आता मी नाट्यरुपांतरं  केलेल्या पहिल्या तीन कथांवर लक्ष केंद्रित करेन कारण तिन्ही नाटके वेगळ्या ढंगाची होती. आणि प्रत्येकाची नाट्यरुपांतरणाची प्रक्रिया वेगळी होती. पहिली म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांची 'सायकल', दुसरी म्हणजे एका दिवाळी अंकात छापून आलेली, उमाकांत घाटे यांच्या 'तीर्थरूप बाबांस' ही.  या कथेचे 'बापजन्म' या नावाने  नाट्यरुपांतर केलं.  आणि तिसरी म्हणजे . मा. मिरासदार यांनी लिहिलेली 'दळण'. प्रत्येक कथेचा (किंवा मूळ साहित्याचा) बाज ओळखून, त्यामध्ये जे योग्य वाटले ते बदल करून त्याचं नाट्यरुपांतर कसं केलं हे आपण पाहूयात.

) सायकल

सायकलची कथा अत्यंत साधी आणि सुंदर आहे. त्यामुळेच ती मनाला चटकन भावते आणि ते जग आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. एका गरीब शिक्षकाने आपल्या मुलाला अमुक अमुक मार्क पाडले की बक्षीस म्हणून सायकल कबूल केलेली असते. जवळ जवळ तीन वर्ष तो कबूल करत असतो, आणि मुलगा मार्क मिळवत असतो. पण गरिबीमुळे मास्तर ती घेऊ शकत नसतो आणि त्याला याची जाणीव असते. शेवटी तो एक सेकंड हँड सायकल विकत घेतोच आणि त्याला कळतं की त्या सायकलीवरून पडून त्याच्याच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा धक्का तो कसं पचवतो आणि त्या सायकलीचं आणि त्याच्या मुलाचं पुढे काय होतं अशी ही कथा आहे.
ही कथा वाचल्या वाचल्या त्यातले सहा मुख्य दृश्ये दिसली - अ) त्यांच्या मुलाला पुन्हा चांगले मार्क मिळाले आहेत ब) मास्तर सायकलवाल्याकडे जातात आणि एकदाची सायकल घेऊन टाकतात क) घरी येऊन ती मुलाला भेट देतात ड) त्यांना सायकलचा इतिहास कळतो ई)ते सायकलवाल्याकडे जाऊन खात्री करतात फ)आणि घरी आल्यावर शेवट.
यामध्ये अनेक वर्णनं आहेत.पण मुख्यतः मास्तरांची घालमेल, त्यांचे मनातले विचार हे मांडून दाखवले आहेत. आता हे नाटकात आणायचे कसे?त्यांचे लांबच्या लांब मोनोलॉग तर असू शकत नाहीत. मग कथाकथन आणि नाटकात फरक तो काय?मग त्यांचा मित्र आणायचा का ज्याच्यापाशी मास्तर मन मोकळं करत असतील?पण अडचण तीच होती - मित्राला 'आणायला' लागलं असतं!मग त्यापेक्षा शाळेतला शिपाई का नको?शिवाय जर आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा शिपायाने जर धीर दिला तर? मास्तरवर एक सुप्त दडपण पण येईल.कदाचित त्यामुळे, तीन वर्ष सायकल घ्यायची टाळाटाळ करत असलेला मास्तर आज बार उडवेल.
विकत घेतलेल्या सायकलचा इतिहास कळल्यावर तो कोणापाशी व्यक्त होईल?मनात जे विचार चालले आहेत, प्रचंड घालमेल सुरु आहे, ती अव्यक्त राहिली तर प्रेक्षकांवर कमी प्रभाव पडेल. पण सांगणार कोणाला?आणि कसं?त्यामुळे सायकलवाल्याकडे खात्री झाल्या झाल्या त्याच्या वर्गातला एक मुलगा बरोबर त्याच्यासमोर येऊन सायकलीवरून पडतो. ते पाहून, त्या मुलावर तो राग व्यक्त करतो आणि भडा भडा बोलतो. एरवी शांत, बुजरा असलेल्या मास्तरचा हा आवेश त्यामुळे ओढून ताणून आणल्यासारखा वाटत नाही.  त्यात, अगदी सुरुवातीलाच नेमके शब्द असलेले संवाद वापरायचे असं मी ठरवलंच होतं. शब्दबंबाळ न होऊ देता, कथेचा अनुभव कसा पोहोचवता येईल याकडे लक्ष दिलं. त्यामुळे प्रत्येक दृश्यात तो मूड तयार होण्यासाठी विविध आवाजांचा वापर केला. शाळेत खराब झालेल्या पंख्याचा आवज. हा सुरुवातीला त्रास देत नाही, पण जेव्हा त्याला सायकलमुळे झालेल्या मृत्यूबद्दल कळतं तेव्हाच तोच आवाज अंगावर येतो. हे आणि असे अनेक निर्णय होते. हे दिग्दर्शकीय कमी आणि नाट्यरूपांतरादरम्यान घेतलेले निर्णय जास्त होते हे मी खात्रीशीर सांगू शकतो.



शाळेतला शिपाई


शाळेतला विद्यार्थी मास्तरांसमोर सायकलवरून पडतो 

२) बापजन्म

'तीर्थरूप बाबांस' ही कथा एका पत्राच्या रूपात आहे.मुलाने आपल्या परागंदा झालेल्या वडिलांना लिहिलेलं पत्र. ते पळून गेल्यानंतर तो,त्याची आई आणि बहीण कसे जगले याचं त्यात वर्णन केलं आहे.मुळात पाहता हा काही नाटकाचा विषय नव्हता. पण मला ती कथा इतकी आवडली होती की मला काहीही करून त्याचं काहीतरी करायचं होतं. मग अनेक प्रसंग, दृश्ये डोळ्यासमोर उभी राहिली - लहान मुलाचे वडील पळून गेले, मामाकडे घालवलेले दिवस, त्याचं शिक्षण - इत्यादी इत्यादी. पण या सगळ्यामध्ये 'नाट्य' सापडत नव्हतं. मग विचार केला की या मुलाच्या पात्राला अनेक वर्षांनी त्याचे वडील एकदम भेटले तर?या प्रसंगात तर नाट्यच नाट्य होतं!आणि हा प्रसंग म्हणजेच संपूर्ण नाटक झालं. एका मुलामध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये १६ वर्षांनंतर झालेला संवाद. यामध्येही सुरुवातीला अगदी कमी संवाद वापरले. त्या दोघांमध्ये असलेलं टेन्शन हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या दोघांमधली अस्वस्थ शांतता खूप काही सांगून जात होती.
आणि नाटक सुरु झाल्या झाल्या हे दोघं कोण आहेत, इकडे का आहेत हे कळलंच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?नाटक संपल्यावर दोघांच्यातलं नातं कळतंय न?प्रेक्षकांच्या मनात कोणती शंका उरत नाही न?मग झालं तर!

३)दळण

मिरासदारांच्या कथेचं नाट्यरुपांतर सर्वात अवघड होतं!एक तर तद्दन विनोदी कथा!तो बाज सुटू न देता ते रंगमंचावर आणणं गरजेचं होतं. गावात आलेल्या नवीन मास्तर इतका रंगेल असतो की त्याला त्याच्या विद्यार्थ्यांकडे बघून समजत असतं की त्यांची आई रूपवती असेल की नाही. वर्गातल्या देखण्या पोराला हेरून, त्याची आणि आईची भेट घडवतोच आणि तिचा नवरा फिरतीवर आहे हे समजल्यावर, तिच्या घरी रात्री भेट द्यायचीच असं निश्चित करतो. तिकडे गेल्यावर काय काय घडतं याचा कथेच्या नावावरून अंदाज बांधता येइलच.
याचं नाट्यरुपांतर पारंपारिक पद्धतीने केलं - म्हणजे प्रसंग, मग काळोख, मग त्यात नेपथ्य बदलून पुढचा प्रसंग. असं अख्खं नाटक बसलं!हसू येत होतं, पण काही केल्या मनापासून मजा येत नव्हती. नेमकं काय होतंय हे समजत नव्हतं!मग एकदा अशी उपरती झाली की या नाटकाचा बाज हा कदाचित पारंपारिक नाटकासारखा नसला पाहिजे. दोन प्रसंगांच्या मध्यात असलेल्या वेळात कंटाळा येतोय आणि प्रेक्षकांचं मन विचलित होऊ शकतं. हे एकदा कळल्या कळल्या त्यामध्ये लगेच बदल करू लागलो. सर्वात महत्वाचं म्हणजे संगीत. यामध्ये मला अभय महाजनची मोलाची साथ मिळाली.रोहित निकमने अत्यंत मजेशीर गाणी लिहून घेतली, गंधार संगोराम ने सोप्प्या आणि सुंदर चाली दिल्या आणि ती गाणी कलाकारांच्या तोंडी बसवली. एक वगळता सगळे काळोख काढले आणि एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाण्याकरता गाण्यांचाच वापर केला. सगळे कलाकार गाता गाताच पुढच्या प्रसंगाचं नेपथ्य लावतात!प्रेक्षकांनी एक सेकंदही इतरत्र कोठेही पाहू नये आणि पूर्ण वेळ त्यांचं मनोरंजन होईल याची तजवीज घेतली. यामुळे नाटकाला एक ताजेपणाही आला. जवळ जवळ ८ वर्षांपूर्वी हे नाटक बसवलं आणि त्याचे प्रयोग अजूनही चालू आहेत!

अमेय वाघ एक प्रासंगिक गाणं सादर करताना

शाळेतली मुले गाताना








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा