१४.६.१५

नाटक बघताना रिटर्न्स!

मागच्या एका लेखात, नाट्यसंस्कारांविषयी बोललो होतो. म्हणजे नाटक पाहतना प्रेक्षकांची वर्तणूक कशी असावी यावर. या सदरातले लेख कोण-कोणत्या विषयवार असावे हा जेव्हा अगदी सुरुवातीला विचार करत होतो तेव्हा मनात पहिल्या पहिल्या आलेल्या विषयांपैकी हा एक. तो खरं नीट विचार करुन, 'काय करायला हवे' या मुद्द्यावर लिहायचा होता. पण 'मिस्टर अँड मिसेस' च्या बाबतीत ती घटना घडली आणि तात्काळ 'काय करू नये' अशा अंगाने तो उत्स्फुर्तपणे लिहिला गेला.
नाटक पाहण्याच्या प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीपासून आरम्भ करुयात. सध्या अनेक नाटकांना फोन बुकिंगची सोय असते. प्रेक्षक आणि नाट्यनिर्माते, दोघांच्या हिताची ही गोष्ट. प्रेक्षकांची केवळ टिकिट विकत घेण्याची एक खेप वाचते, आणि नाट्यनिर्मात्यांना एक आश्वासन मिळते की इतके इतके तरी प्रेक्षक येणार आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की प्रयोगच्या दिवशी प्रेक्षक नाटयगृहाला उशिरा, किंवा अगदी ऐनवेळी पोचतात. किंवा पोहोचतच नाहीत. त्यामुळे ती टिकीटे एकतर वाया जातात किंवा ऐनवेळी दुसऱ्या एखाद्या प्रेक्षकाला विकली जातात. ही गैरसोय टाळण्यासाठी, सर्वात महत्वाचं म्हणजे नाट्यगृहाला प्रयोगच्या किमान अर्धा ते पाऊण तास आधी पोहोचावं. जर शक्य नसेल तर तसे फोन करून कळवून आश्वासन द्यावं आणि मुख्य म्हणजे ते पाळावं! जर नाटकाला यायला जमणार नसेल याची खात्री असेल तर ते लवकरात लवकर कळवावं.
एकदा टिकिट मिळालं की पहिली घंटा झाली की जाऊन आपल्या जागेवर बसावं. नाटक बघणं हा अनुभव असतो, आणि या अनुभवाची सुरुवात त्या नाटकाचा प्रयोग सुरु व्हायच्या आधी, तिकड्या वातावरणामुळे सुरु होते. तिसऱ्या घंटेनंतर अनेक प्रेक्षक येतात. त्यामुळे ते तर सुरुवातीपासून अनुभव घेत नाहीत ही गोष्ट वेगळीच, पण ते स्थानापन्न होईपर्यंत इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो. आणि कलाकरांचा तर होतोच होतो. आपल्याकडे चित्रपट संस्कृती आणि नाटक संस्कृतीमध्ये काही भेद नाही हे जाणवतं. पण नाटकामध्ये समोर रंगमंचावर खरे - खुरे, हाडामासाचे कलाकार त्याक्षणी आपली कला सादर करत असतात याचे भान प्रेक्षकांनी ठेवले पाहिजे, आणि त्याचा आदरही केला पाहिजे.
अनेक ठिकाणी तिसऱ्या घंटेनंतर प्रवेश बंद करण्यात येतो. ही प्रथा पाडणं, अशी शिस्त लावणं अत्यंत गरजेची आहे.
प्रयोगच्या दरम्यान आपल्यामुळे कोणाचाही रसभंग होऊ नये ही जबाबदारी प्रत्येक प्रेक्षकाची आहे. अनेक लोकं प्रयोग सुरु असताना आपापसात बोलतात, मोठ्यांदा कॉमेंट करतात. लहान मुलं दंगा करतात. यामध्ये लहान मुलांचा काय दोष?त्यांच्या आई-वडिलांना कळलं पाहिजे. लहान मुलांना बऱ्याचदा घरी एकटं सोडणं शक्य नसतं, मान्य आहे. पण जर त्यांना नाटकाला आणायचंच असेल, तर 'क्राय रूम' मधून नाटक पाहण्याची एका पालकाने तयारी ठेवावी. बऱ्याचदा हा अनुभव येतो की अगदी इतर प्रेक्षकांनी तक्रार करेपर्यंत रडणाऱ्या मुलाचे पालक कोणतंही पाऊल उचलत नाहीत. हा झाला अगदीच लहान बाळांचा मुद्दा. मोठ्या मुलांना तर त्यांच्या पालकांनी सांभाळलंच पाहिजे! 'मला नाटक बघायचं आहे, मुलांनी प्रेक्षागृहात काहीही करावं' असा विचार आणि कृती दोन्ही चुकीचं आहे!
मोबाईल फोनबद्दल बोलायची गरज तरी आहे का?म्हणजे, गरज आहे.नक्कीच आहे.पण अजून काय आणि किती बोलायचं याबद्दल?तो बंद करता येणार नसेल, तर निदान सायलेंटवर करावा हे का कळत नाही लोकांना?हा प्रश्न तर फारच सतावतो.फोन वाजतोच कसा?काही निर्मात्यांनी स्वखर्चाने मोबाईल जॅमर पण आणले आहेत. पण त्यांचा वापर होऊ नये या मताचा मी आहे. कारण प्रेक्षकांमध्ये एखादा डॉक्टर असू शकतो ज्याला कधीही बोलावणं येऊ शकतं.किंवा कुठल्याही प्रेक्षकाच्या कुटुम्बाला त्यांची तात्काळ गरज भासू शकते. किंवा इतर काही.... पण तरी याचा त्रास इतरांना होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतलीच पाहिजे.
मध्यांतरामध्ये अनेक प्रेक्षक कलाकरांना भेटायला, गप्पा मारायला, फ़ोटो काढायला येतात. मध्यांतर हा जितका प्रेक्षकांसाठी असतो, तितकाच कलाकरांसाठी पण असतो याचं भान असलं पाहिजे.त्यांना थोड़ी विश्रांती मिळावी, पुढच्या अंकाची तयारी करावी यासाठी असतो. अनेक प्रेक्षक तर मध्यांतरात येऊन कलाकराच्या कामबद्दल, नाटकाबद्दल प्रतिक्रिया पण देऊन जातात! त्यामुळ कलाकरचं लक्ष विचलितही होऊ शकतं! प्रेक्षकांना भेटणे, त्यांचे कौतुक करणे, त्यांच्यावर टीका करणे, हे प्रयोगानंतरही होऊ शकतं.आणि ते तेव्हाच व्हावं!
राहता राहतो एकच महत्वाचा मुद्दा - स्वच्छता!जवळ जवळ सगळ्याच नाट्यगृहांमध्ये खाद्य - पेयांना बंदी असते.पण ती कोणीही जुमानत नाही.व्यवस्थापनला पण ते थांबवता येत नाही. प्रेक्षागृहात खाणे टाळावे. नंतर 'उंदीर होतात' वगैरे तक्रारी आपणच करतो. व्यवस्थापनाने स्वच्छता राखावी हा पुढचा मुद्दा आहे. शक्यतो कचरा करुच नये. आणि झालाच तर तो कचरापेटीशिवाय दुसरीकडे कुठेही टाकू नये याची काळजी घ्यावी. गुटखा, पान, तंबाकू खाऊन थुंकण्याविषयी बोलायची अजिबातच गरज नाही.
असो..तर या सगळ्या प्रयोगाला येताना लक्षात ठेवायच्या गोष्टी.तसं पाहिलंत तर अत्यंत साध्या आणि सोप्प्या गोष्टी आहेत. कुठेही वायफळ अशी अपेक्षा नाही. ही थोड़ी शिस्त पाळली गेली तर नाटकाचा आनंद कितीतरी पटीने वाढेल यात शंका नाही!
हा कदाचित लेख कमी, आणि प्रबोधनकारक निबंध वाटला असेल.किंवा 'यात काय नवीन?हे तर सगळं आम्ही करतोच' असंही वाटलं असेल. जर करत असाल तर चांगलंच आहे!पण नसाल तर हे जरूर आमलात आणावं अशी मी या लेखाद्वारे कळकळीची विनंती करतो!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा