परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो. बाल गंधर्व रंगमंदिरात. 'प्रयत्न' नावाचा नृत्याशी निगडीत महोत्सव होता. त्यामध्ये शेवटच्या दिवशी 'नृत्याग्राम'
या संस्थेचा कार्यक्रम होता. 'Songs of Love and Longing'
असं त्या कार्यक्रमाचं नाव होतं. या कार्यक्रमाची भरपूर स्तुती विविध लोकांकडून ऐकली होती. ओडिशी नृत्यातून राधा आणि कृष्णाची कथा सांगणार होते. आवर्जून तिकडे गेलो, मित्र मैत्रिणींनाही सांगितलं. एका तासासाठी ३५० रुपयाची तिकीट काढून बसलो .
कार्यक्रम चांगला होताच, पण बालगंधर्व मध्ये असलेल्या तमाम डासांनी त्या कार्यक्रमाची गंमत फारच कमी केली. माणशी किमान १०-१५ डास तरी असतील. यात अजिबात अतिशयोक्ती नाही! बाहेर पडल्यावर काही तासांनी मला आश्चर्य याचं वाटत होतं की या घटनेबद्दल रंगमंदिरातून बाहेर पडल्या पडल्या मला गोष्टीचा विसर पडला होता. इतकी हि गोष्ट रोजची झाली होती! हे जाणवल्यावर अधिक विचार करू लागलो - कोणतं रंगमंदिर असं जिथे सर्व सोयी सुविधा यथास्थित आहे? एक प्रेक्षक म्हणून, किंवा कधी कधी एक नाटकवाला म्हणून मला एका रंगमंदिरामुळे कधी चांगला अनुभव आला आहे?असं कोणतं रंगमंदिर अस्तित्वात आहे? एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतील!त्यात पण, आपल्या देशाच्या सांस्कृतिक राजधानीतली एखादंच असेल.
इकडे डास तर दुसरीकडे अत्यंत दुरावस्थेतली शौचालय, तिसरीकडे तुटलेली आसनं आणि अजून काय काय!काही काही ठिकाणी ते हे सर्व एकत्र.स्वच्छतेबद्दल न बोललेलंच बरं.
![]() |
छायाचित्रे जरी प्रातिनिधिक असली तरी मूळ परिस्थिती काही फार वेगळी नाही! |
काही वर्षांपूर्वी आम्ही कोकणच्या दौर्याला गेलो होतो. उन्हाळ्यात होते, पहिला दापोलीत, दुसरा रत्नागिरीत आणि तिसरा चिपळूणमध्ये. दापोलीमध्ये विजेच्या सोयीमध्ये मध्ये काहीतरी गडबड होती. ती निस्तरता निस्तरता जवळ-जवळ एक तास उशीर झाला. त्यात आमच्या प्रकाशयोजनाकाराला २-३ वेळा विजेचे झटके बसले ते वेगळेच. कलाकारांसाठी कपडे बदलण्याची जी खोली होती त्यामध्ये अनेक किडे होते. प्रयोग झाल्यावर कोणीतरी सांगितलं की रत्नागिरीचं रंगमंदिर चांगलं आहे ! अगदी 'शहरासारखं'. ते रंगमंदिर नक्कीच जास्त चांगलं बांधलं होतं. पण तिकडे न पंखे न वातानुकूलनाची सोय. त्यामुळे प्रेक्षक तर हैराण होतेच पण प्रयोगानंतर कलाकारांची कीव यावी अशी दशा झाली होती. ते तर पूर्णवेळ मोठ्या दिव्यांसमोर, न दमता, पूर्ण ताकत लावून प्रयोग करत होते. त्यामुळे त्यांना इतका घाम आला होता की सगळे कपडे त्यांना अक्षरशः चिकटले होते!कोणी चक्कर येऊन पडलं नाही हे नशीब. आणि चिपळूणबद्दल तर जितकं बोलावं तितकं कमीच आहे.सुरुवात तिकिटाच्या प्लॅनने झाली. तिकीट विक्री किती झाली हे बघायला गेलो होतो तेव्हा दिसलं की त्या कागदावर काही आसनांवर नेहमीच्या फुल्या होत्या आणि काहींवर काळी ठिगळं उमटवली होती. 'याचा अर्थ काय?' असं विचारलं असता मला सांगण्यात आलं की त्या तुटलेल्या खुर्च्या आहेत. चुकून विकू नये म्हणून ही खबरदारी ते घेतात. आतमध्ये गेल्यावर मला (नाटकाचा दिग्दर्शक म्हणून) सर्वात पहिले रंगमंच कुठे कुठे खचला आहे ते दाखवण्यात आलं. म्हणजे मी ते कलाकारांना सांगेन की त्यांनी चुकूनसुद्धा त्यावरून वावरू नये. नाहीतर सादरीकरणाच्या दरम्यान ते त्यात अडकून पडतील. आणि रंगमंदिरात विवध पक्षीही होते जे प्रयोगादरम्यान इकडे तिकडे उडत होते. वाईट याचं वाटत होतं की हे रंगमंदिर सुधारण्याचा निधी मंजूर झाला होता पण काही राजकीय कारणांमुळे तो निधी अडकला होता असं कानावर आल होतं.
तुम्हापैकी काही वाचकांना वाटत असेल 'या पुणेकराला सगळीकडे चैनीचीच सवय दिसतीये. नाटक करायचं म्हणजे अडचणी येतातच. याहून दारुण परिस्थितीत प्रयोग झालेच आहेत.' पण या मूलभूत सुविधा नाही का?एक प्रयोग सादर करायला काय लागतं? स्वच्छ परिसर, एक आयताकृती,समतल ठोकला(ज्याला आपण रंगमंच म्हणू), काही दिवे, लोकांना ऐकू जाईल अशी ध्वनीव्यवस्था, कपडे बदलण्यासाठी रंगमंचाशेजारी खोली आणि एक स्वच्छ शौचालय. किमान या सोयी नकोत का? 'या सोयी नाहीत तरी आम्ही नाटक करतो' यात भूषण मानायचं? एका प्रकारे हे प्रस्थापित गोष्टींना प्रोत्साहन दिल्यासारखं नाही का?
म्हणजे सगळीच रंगमंदिरं वाईट आहे का?मुळीच नाही. पण माझा असा अंदाज आहे, की जी रंगमंदिर सरकारच्या हातात आहेत त्यांची जास्तकरून दुरवस्था असते. जर सर्वेक्षण केलं तर त्यातून हेच निष्पन्न होईल यात शंका नाही. त्यात काही रंगमंदिरात नित्यनियमाने होणारे 'नाचाचे कार्यक्रम' यांच्यामुळेही दुरवस्था होते. त्या कार्यक्रमांना येणारे प्रेक्षक गुटखा,पान,तंबाखू खाऊन थुंकतात. रंगमंदिरात आपल्या आसनावर नाचतात. हे कार्यक्रम बंदच व्हायला पाहिजेत या मताचा मी नाही. काही लोकांच्या ते करमणुकीचं ते साधन आहे, काहींचं पोट त्यावर आहे. पण मग व्यवस्थापनाने जबाबदारी घेऊन, तशा प्रकारचं वर्तन होणार नाही याची खात्री केली पाहिजे.
मुंबईमध्ये पृथ्वी, किंवा NCPA, किंवा पुण्यामध्ये कित्येक शाळांची, कंपन्यांची रंगमंदिरं आहेत जी फार छान ठेवली आहेत. खरोखर जपली आहेत. महानगरपालिकेची मालकी असलेल्या रंगमंदिरांची व्यवस्था जर दुसऱ्या कोणाला दिली तर? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मला खात्री आहे की याचा व्यवसाय म्हणून विचार केला तर त्यामध्ये फायदा नक्की होईल. फक्त कलाकार आणि प्रेक्षकांचा नव्हे, तर सरकार आणि नाट्यनिर्मात्यांना आर्थिक फायदाही होईल.
जे प्रस्थापित आहे, तेच बरोबर आणि तसंच चालू राहणार हा विचार आता सोडला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही न काही तरी क्रांती घडली आहे ज्यामध्ये त्या क्षेत्रात अनेक मूलभूत बदल घडले आहेत. नाट्यक्षेत्र त्याला अपवाद आहे..प्रत्येक पिढीला वाटतं की ते काहीतरी सकारात्मक बदल घडवतील. मी आणि माझी पिढी काय करते आहे, याची मला प्रचंड उत्सुकता आहे. आमच्या हातून असं काहीतरी घडावं अशी मी रोज प्रार्थना करतो.ही प्रार्थना आता कृतीत लवकरात लवकर उतरावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा