१४.६.१५

अतुल कुमार...

अतुल कुमार यांची परवा ईमेल आली. त्यांच्या ईमेलची ख़ासियत ही आहे की त्यांनी ती कितीही जणांना पाठवली असो,तुम्हाला आलेली मेल ही तुम्हालाच उद्देशून असणार.आता हे ते स्वतः करतात की कोणाला तरी करायला लावतात किंवा कुठलं सॉफ्ट-वेअर वापरतात हा भाग वेगळा.पण हे खरं की त्यांची प्रत्येक मेल ही जणू काही तुम्हालच लिहिली आहे असं वाटतं.असो,तर सांगायचा मुद्दा हा की अतुल कुमार यांची परवा मेल आली आणि त्यांनी कामशेतला बांधलेल्या त्यांच्या घरी बोलावलं.कामशेत धरणापाशी त्यांच्या संस्थेच्या नावचं-द कंपनी थिएटर चं-एक घर आहे.बऱ्याच मोठ्या जागेवर एका तळ्याशेजारी ते घर वसलं आहे. तिकडे तालमी होतात अन् कधी कधी प्रयोगही.फार मस्त आहे वगैरे वगैरे.
हे सगळं नुसतं ऐकत होतो गेली काही वर्ष. म्हणजे ते अशी एक जागा बांधत आहेत, ते या जागेसाठी निधी गोळा करत आहेत,आज त्या जागेचं बांधकाम सुरु झालं, ती जागा बांधून झाली.हे शेवटचं विधान मी जवळ जवळ अडीच वर्षांपूर्वी ऐकलं.नंतर तिकडे गो. पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित 'सत्यशोधक' या नाटकाचा प्रयोगही आयोजित केला होता.'तिकडे प्रयोग कशासाठी?' हा प्रश्न आपसुक पडलाच.तसंच, जेव्हा ही मेल आली तेव्हा त्यात 'उणे पुरे शहर एक'चा प्रयोग तिथे आयोजित केल्याचा उल्लेख होता.त्या दिवशी मी तिकडे हजेरी लावणार असं ठरवलं.
अतुल कुमार हे मुंबईतून गेली अनेक वर्षे नाटक करीत आहेत. भारतातले ते आघाडीचे नाट्यदिग्दर्शक , अभिनेते आणि निर्माते आहेत. रजत कपूर, विनय पाठक यांच्याबरोबर 'द कंपनी थिएटर' ही संस्था त्यांनी काही वर्षांपूर्वी सुरु केली.त्या अंतर्गत अनेक नाटके केली.'हॅम्लेट: द क्लाउन प्रिंस' ने सुरुवात करत पुढे 'नथिंग लाइक लियर' ,'नॉयजेस ऑफ','पिया बेहरूपिया' या नाटकांनी रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला!फक्त भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये या नाटकाचे परप्रयोग झाले आणि प्रेक्षकांनी या नाटकांना अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं!
'हॅम्लेट: द क्लाउन प्रिंस' किंवा 'नथिंग लाइक लियर' ही नाटकं तर जिबरिश मध्ये आहेत. म्हणजे ती सादर करण्यासाठी कोणतीच भाषा वापरत नाहीत. बोलत असतात, पण असंबद्ध. शब्द नाहीत,फक्त आवाज.तरीही नेमकं काय म्हणायचंय हे पूर्णपणे कळतं!आणि भरपूर मनोरंजन होतं!मला सगळ्यात पहिला प्रत्यय हा पृथ्वी थिटरच्या महोत्सवाला आला होता. तिकडे प्रत्येक संस्थेला काहीतरी सादर करायला दहा मिनिटाचा वेळ दिला होता. तिकडे अतुलने एकपात्री प्रयोग सादर केला.असंच,जिबरिशमध्ये. दहा मिनिटांत त्या सादरीकरणामुळे खूप हसू पण आलं आणि रडूही.इतकी ताकत त्यात होती.
त्यानंतर पुण्यात 'पिया बेहरूपिया' या नाटकाचा प्रयोग झाला. शेक्सपिअरच्या 'ट्वेल्थ नाइट' चा अमितोष नागपाल ने स्वैर रूपांतर हिंदीमध्ये केलं आहे जे अतुलने बसवलं आहे. ते नाटक बघणं हा माझ्यासाठी एक फारच परिपूर्ण, आश्वासक अनुभव होता. जेव्हा आपल्या कामाबद्दल शंका येऊ लागली होती, आपली वाट चुकली आहे का? असे विचार येत होते तेव्हा ते नाटक पाहिलं गेलं आणि हे सगळे विचार दूर गेले. तसं मी तेव्हा जाऊन अतुलना सांगितलंही. वास्तविक माझ्या कौतुकाची त्यांना काहीच गरज नव्हती कारण जगभरातून त्यांचं कौतुक होतच होतं. तरी कौतुकाने कुठेही हुरळुन न जाता अतुल इतकंच म्हणाले - 'We try'.

जवळ जवळ सव्वा तास गाडी चालवल्यानंतर, काही वेळ ख़राब रस्ते झेलत त्यांच्या कामशेतच्या घरापाशी पोचलो. ते पाहून चाटच पडलो.तिकडे खालती एक मोठी खोली बांधली आहे. तिकडे गाद्या घातल्या होत्या. ती कलाकारांची राहण्याची सोय असावी.दुसऱ्या बाजूला तळं होतं.आणि तळ्यासमोर, एका मोठया झाड़ाखाली एक रंगमंच बांधला होता. रंगमंचासमोर बसण्याची व्यवस्था केली होती - काही सतरंज्या आणि खुर्च्या.पुणे-मुंबईहून नाटकातली अनेक मंडळी आली होती.पण तरी अनेक म्हणजे किती?पन्नास असतील.पन्नास लोकांसाठी इकडे प्रयोग लावला असेल?असंही मनात येऊन गेलं.
काही वेळ ती जागा बघण्यात गेला. अत्यंत शांत आणि रमणीय.अतुल आता तिकडेच राहतात. नाटकाच्या तालमी तिकडे घेतात. कलाकार तालमीसाठी पूर्ण वेळ तिकडे येऊन राहतात. नाटक सोडून दुसरा कोणताही विचार मनात नाही, दुसरा कोणतंही व्यवधान नाही. एकदा नाटक बसलं, की मग जगासमोर त्याचे प्रयोग होतात. आणि त्यांचं नाटक आहे म्हटल्यावर ते खरोखर जगासमोरच होतात.






जशी जशी प्रयोगाची वेळ जवळ आली, तशी तशी आजू-बाजूच्या गावातली लोकं येऊ लागली.जवळ जवळ दोनशे गावकरी एक पूर्णपणे शहरी नाटक बघायला आले होते.त्यात अनेक लहान मुलं पण होती.हा प्रयोग पूर्णपणे विनामूल्य होता.अतुल आणि त्यांचे सहकारी हे घराघरांमध्ये जाऊन लोकांना घेऊन येत होते. हे पाहुन तिकडे प्रयोग लावण्यामागचा हेतू कळला!मी ते नाटक आधी पुण्यात पाहिलं होतं, पण मला तरी वाटलं की त्यादिवशीचा प्रयोग जास्त चांगला झाला!आणि याला त्या लोकांकडून मिळणारा प्रतिसाद कारणीभूत होता. मी आधी कुठल्यातरी लेखात म्हणलं होतं की नाटक करण्यासाठी जागा नसतील तर नाटकं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. नाहीतर काहीही न करता रडत बसणं की नाटकं होत नाहीत, ही कला लोप पावत चालली आहे, नाटकाला प्रेक्षक नाही वगैरे प्रतिक्रियांना काही अर्थ नाही !

जगभर नाटक करुन,त्यातून पैसे कमावून,त्यातला काही भाग ही संस्कृती लोकांमध्ये रुळावी यासाठी अतुलचा हा प्रयत्न पाहून खूप ऊर्जा मिळाली.जाता जाता हे त्याला सांगितलं...पुन्हा ते इतकंच म्हणाले -'We try'.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा