१४.६.१५

चार दिग्दर्शकांचा प्रयोग

२०१० साली मोहित टाकळकरने असा अचानक फोन केला. खरंतर आमचं रोजचं बोलणं नसल्याने त्याचा कधीही फोन आला तरी अचनकच वाटायचा. मोहित नुकताच इंग्लंडमधील एक्झेटर येथील विद्यापीठातून नाटकाचं वर्षभर प्रशिक्षण घेऊन आला होता.
त्याने तातडीने भेटायला बोलावलं. त्याला भेटल्यावर म्हणाला की त्याने तिकडे मार्टिन क्रिम्पचे Attempts On Her Life या नाटकचा प्रयोग पाहिला होता आणि त्याने प्रभावित होऊन त्याची संहिता तो भारतात घेऊन आला होता. हे नाटक त्याला इकडे, मराठीमध्ये करायची इच्छा होती आणि त्यासाठी तो योग्य संच निवडत होता.त्याच्या मनात होतं की एकापेक्षा जास्त दिग्दर्शकांनी या नाटकाचा काही काही भाग बसवावा.आणि मग नंतर त्याचा एकत्र, एकसंध नाटक म्हणून त्याचा प्रयोग सादर करावा. हे ऐकून फार मजा वाटली.म्हणजे नाटकामध्ये प्रयोग केलेच होते. पण ते बरेचस विषयशी किंवा संहितेशी निगडित असायचे.किंवा एखाद्या वेगळ्याच नट/ नटीकडून अभिनय करून घेण्यात पण प्रयोग केले होते. काही चालले काही फसले. पण हा असा प्रयोग माझ्यासाठी तरी नवीन होता!
काही महिन्यांनी मोहितने पुन्हा फोन केला. त्याने प्रदीप वैद्यकडून मराठीमध्ये एक संहिता लिहून घेतली होती, त्याच्या वाचनासाठी. 'तिची १७ प्रकरणे' असं नाव. तिकडे गेलो असता, आलोक राजवाड़े, वरुण नार्वेकर आणि सारंग साठ्ये हे उरलेले तीन दिग्दर्शक आहेत हे कळल्यावर तर अजून उत्सुकता वाढली. मुळात हा डोलारा सांभाळणार कसा हा प्रश्न होता. कारण नाटक म्हटलं की तालमीदरम्यान 'जे दिग्दर्शक म्हणेल ते' असा एक अलिखित नियम असतो.आणि इकडे तर अशी चार टाळकी असणार होती.
मोहितने संहितेचं वाचन केलं. काही दृश्ये कळली, काही नाही.एका 'आशी' या पात्राची गोष्ट वेग वेगळ्या पात्रांच्या तोडून, तुटक प्रसंगांमधून सांगण्याचा तो प्रयत्न होता.तिच्या आजू-बाजूला असलेली लोकं, त्यांचं तिच्याबद्दलचं आकलन,तिच्या आयुष्यात घडलेले प्रसंग,हे सगळे त्यामध्ये होते.आणि त्याला सूत्र फक्त एकच - 'आशी'. संहिता ऐकून, पुढे सगळ्यांशी चर्चा करून हे जाणवलं की खरंच एका माणसाचं अख्खं आयुष्य, त्याच्या आयुष्यात येणारे प्रसंग, लोकं , त्या लोकांमध्ये त्या माणसाबद्दल होणाऱ्या चर्चा, असं सगळ आपण पहायचं म्हंटलं तर त्या सगळ्यामध्ये तरी कुठे सुसूत्रता असते?
त्यात एकापेक्षा जास्त लोकांनी मिळून तो प्रयोग बसवणं पण योग्य वाटत होतं, म्हणजे तितके जास्त दृष्टिकोन त्या नाटकाला मिळतील. दृष्टिकोन यासाठी, कारण ती मूळ संहिता पण नेहमीपेक्षा जरा वेगळी होती. म्हणजे संवाद होते, पण तेवढंच! म्हणजे कुठली पात्र बोलतायेत, ते कुठे बोलतायेत, त्या पात्रांची वयं काय असतील, कोणते कपडे घातले असतील वगैरे सगळ हे दिग्दर्शकाने ठरवायचं.हा ही एक आगळाच प्रयोग!म्हणजे एका दृश्याचं तर सरळ गाणं बनावलं आणि तसं सादर केलं तर एक प्रसंग नाटक सुरु व्हायच्या आधी, प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स म्हणून सादर केला!
मग सर्वप्रथम प्रत्येक दिग्दर्शकांनी मिळून त्या १७ पैकी त्यांना सगळ्यात जास्त कोणती दृश्ये आवडली, भावली याची यादी बनावली. त्यात अर्थात एकापेक्षा एका दिग्दर्शकने एकाच प्रसंगाची निवड करणं सहाजिकच होतं. मग ते आपापसात बोलून, निस्तरुन आम्हा प्रत्येककडे ४-५ दृश्ये आली. मग आम्हाला जे अभिनेते-अभिनेत्री हव्या होत्या त्यांची एक यादी बनावली. ती पड़ताळून पाहिली. मग त्या त्या नट-नटीला विचारलं की अशा प्रयोगाचा भाग व्हायला आवडेल का? हे सगळ करून १४ कलाकर निवडले. या कलाकरांचा खरा कस लागणार होता!कारण नाटक जरी एक असलं तरी त्यांना चार चार तालमी कराव्या लागणार होत्या! हे आवाहन पेलू शकणारे १४ उत्तम कलाकार मिळाले हे या नाटकाचं खूप मोठं यश आहे.
तालमी सुरु झाल्या. प्रयोगाची तारीख ठरली. एक एक प्रसंग वेग वेगळ्या पद्धतीने बसवू लागले. मग त्यामागची कारणे, त्या प्रसंगाचा, पात्राचा भूतकाळ, त्यांनी एक संवाद असा म्हंटला तो का म्हंटला?यामागची कारणं कलाकारांबरोबर ठरावली. हा सगळा डोलारा उभा करणं हे आर्थिकदृष्ट्या पण कठीण काम होतं. इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट्स (IFA) या संस्थेला रीतसर अर्ज केला. त्यांनी पण यात आवर्जून लक्ष घातलं आणि काही दिवसांनी त्यांनी संपूर्ण खर्च उचलायची तयारी पण दाखवली आणि केली पण!
जवळ जवळ २ महीने रोज १०-१२ तास तालीम चालायची.दिग्दर्शकांचे 'स्लॉट' ठरलेले असायचे. ते त्यांच्या वेळेत येऊन त्यांच्या दृश्यांची तालीम घ्यायचे. पण कलाकार मंडळी तिकडेच!सकाळी वेगळ पात्र,दुपारी वेगळ आणि संध्याकाळी वेगळ!पण त्या सगळ्यांनी मिळून जी ऊर्जा आणली ती जगावेगळी होती..
या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.अत्यंत शिस्तबद्ध!जवळ जवळ १५ प्रसंगांचं नेपथ्य, वेशभूषा,प्रकाशयोजना,संगीत,दृक्श्राव्य संयोजन संभाळण्याचं काम पण अगदी चोख पार पडलं..
हे नाटक काही लोकांना खूपच आवडलं, काही लोकांनी खूपच शिव्या घातल्या.काही लोकांना त्याच्या नावावरून वाटलं की हे एक चावट नाटक आहे.त्यांचा हिरमोड झाला इत्यादी इत्यादी.
या नाटकाचे ठीक ठिकाणी प्रयोग केले.दिल्लीला होणाऱ्या 'महिंद्रा एक्सेलेन्स इन थिएटर अवॉर्डस्'ला या नाटकाला मानाची अनेक पारितोषिकं पण मिळाली.

असो..बाकी काहीही असो, म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया किंवा परितोषिकं किंवा अजून काही.अशा एका प्रयोगाचं दिग्दर्शन करायला मिळणं हा खरंच एक विलक्षण अनुभव होता.आणि हा असा अनुभव पाठीशी असणं हे मी माझं भाग्य समजतो.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा