२.४.१५

एकांकिका !!

नुकत्याच एका एकांकिका स्पर्धेचा परीक्षक म्हणून बोलावणं आलं. एकांकिकेचा परीक्षक म्हणून जायची पहिलीच वेळ. त्यामुळे मला पण फार उत्सुकता होती. नाटकाच्या या स्वरूपानेच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. साधारण ४० मिनिटांमध्ये एक हलवून टाकणारा नाट्यानुभव प्रेक्षकांना द्यायचा!त्यात तुमच्या प्रयोगाच्या आधी आणि नंतर हमखास अजून एकांकिका असणारच. आधीच्या एकांकिकेच्या अनुभवाच्या वरताण असा प्रयोग झाला पाहिजे आणि पुढच्या प्रयोगाने आपला अनुभव मिटवू नये अशीही एक अपेक्षा असतेच!
थोडक्यात काय तर एकांकिका म्हंटलं कीस्पर्धा हा शब्द आपसूक त्याला जोडला जातो, याची प्रचीती एकदम आली!

असो! तर मोठ्या अपेक्षेने मी या स्पर्धेला गेलो. सगळ्यात आधी तर स्पर्धा सुरु व्हायला तीन तास उशीर झाला. स्पर्धक आले होते, काही प्रेक्षक आले होते. आम्ही परीक्षक तर होतोच. उशीर यासाठी, की काही चित्रपटातले कलाकार येणार होते, त्यांच्या आगामी चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी. त्याकरिता ही स्पर्धा तीन तास उशीरा सुरु झाली!

बरं हे कलाकार असे की त्यातल्या अनेकांनी नाटक केलं ही नाहीये. तिकडे येऊन कुठल्यातरी आधीच्या, कोणालाही माहिती नसलेल्या स्वतःच्याच चित्रपटाचा स्वतःच्याच तोंडाने कौतुक केलं. त्यातलेडायलॉग म्हणून दाखवले. एक तर इतका विचित्र प्रकार घडला की तो डायलॉग म्हणायच्या आधी त्या कलाकाराला लक्षात आलं की आपल्या तोंडात च्युईग गम आहे म्हणून त्याने ते तसंच रंगमंचावर तोंडातून काढलं आणि एका कार्यकर्त्याच्या हातात दिलं!

या अशा प्रकारे स्पर्धेला सुरुवात झाल्याने पुढे काय काय होणार आहे याची कल्पना आलीच होती. जशी स्पर्धा पुढे पुढे सरकायला लागली तसं जाणवत गेला की ही स्पर्धा काही नाट्यप्रेमातून किंवा नाटकाप्रती असलेल्या आसथेतून भरवण्यात आली नव्हती. ज्या पक्षाच्या माणसाने भरवली होती, त्याला त्याच्या राजकिया ‘Bio-data’ मध्ये अजून एका गोष्टीची भरती करायची होती. तो स्वतः तर तिकडे पूर्णवेळ नसायचाच पण सगळे मिळून तीन कार्यकर्ते अख्खी स्पर्धा चालवायचा प्रयत्न करत होते. कदाचित इतर कार्यकर्त्यांना हे कळून चुकलं होतं की यात काही पैसा नाही, आणि याने पक्षातल्या वरच्या लोकांना काही फरक तर मुळीच पडणार नाही. त्यामुळे कशाला कामं करा अन् मरा?

पण स्पर्धक मात्र जीव तोडून काम करत होते. आणि समोर चाललेलं नाटक चांगलं असो किंवा वाईट, त्यांच्या सादर करण्याच्या निष्ठेवरून त्या स्पर्धेला उपस्थित राहण्याचं चीज झालं असं वाटत होतं. त्याच बरोबर जे स्पर्धेचे तथाकथित आयोजक होते, त्यांची काही मित्रमंडळी प्रेक्षागृहात बसली होती. कारण समोर प्रेक्षक तर हवाच. आणि मुळातच त्यांना तिकडे बसायची इच्छा नसल्याने गप्पा मारल्या जात होत्या, फोन वाजत होते इत्यादी. ते इतकं होत होतं की माझ्याबरोबर जो परीक्षक होता तो अधून मधून उठून जाऊन त्या प्रेक्षकांना शांत करत होता. आणि मी बसून नाटक बघत होतो, कारण एका परीक्षकाने तरी नाटक बघितलं पाहिजे!
शेवटची एकांकिका बघून, आम्ही मागच्या खोलीत पोचलो.आता तिकडच्या टेबल-खुर्चीवर बसून निकाल लावायचा, असं आम्ही दोघं बोलत होतो.आम्ही खुर्चीवर बसणार इतक्यात मुख्य आयोजक (ज्याच्या ‘Bio-Data’ मध्ये हे लिहिलं जाणार होतं) तो धावत आत आला आणि निकाल लगेच मागू लागला!त्यांच्यामुळे झालेल्या उशिरामुळे पुढच्या कार्यक्रमाची लोकं बाहेर येऊन थांबली होती. आणि पुढचा कार्यक्रम म्हणजे काय साधं-सुधं नाटक नव्हतं, तर एका सांप्रदायाचा मेळावा होता!’नाटकाचे प्रेक्षक असले असते तर थांबवून ठेवलं असतं बाहेर  असा त्यांचा विचार असावा.पण एका विशिष्ठ सांप्रदायच्या लोकांचा बाहेर खोळंबा कसा करून चालेल?त्याने राजकिय कारकीर्द धोक्यात नाही का येणार?

व्यवस्थापन कसे नसावे याचा तो एक उत्तम धडा होता!बक्षीसवितरणानंतर मुख्य आयोजक स्वतः येऊन भेटला.’कशी वाटली स्पर्धा?’ असं विचारलं.त्यावर मी म्हणालो कीअशीच चालू राहिली तर पुढच्या दोन वर्षात बंद पडेल.आणि खरंच काही वर्षात ती स्पर्धा बंद पडणार यात मला तीळमात्र शंका नाही.

कारण आपण जर नीट पाहिलंत तर वर्षानुवर्ष टिकलेल्या स्पर्धा या काही फक्त नाटकांमुळे टिकलेल्या नाहीयेत.तर तो सगळा कारभार कसा हाताळला जातो, यावरही त्यांचं यश अवलंबून आहे. ‘पुरुषोत्तमचंच  उदाहरण घेऊयात. यंदापुरुषोत्तमने  पन्नाशी गाठली.प्रत्येकाने पुरुषोत्तमच्या आपल्या आठवणी तपासून पाहिल्या तर एक समान धागा नक्की आढळेल. तो  म्हणजे त्यांच्या चोख व्यवस्थेचा. मग स्पर्धेचा फॉर्म वाटपापासून ते बक्षीस समारंभापर्यंत त्यांची व्यवस्था अगदी ठरलेली असते, आणि सगळे आयोजक  कुठल्याही बाबतीत दुर्लक्ष करता, तंतोतंत ठरलेली कामं करायची काळजी घेतात.

त्यांच्या या सच्चेपणामुळे, तीच वृत्ती स्पर्धकांमध्ये आणि पर्यायाने प्रेक्षांमध्येही उतरते. एक चांगली कलाकृती करायला जी शिस्त लागते, त्याचे बाळकडू या अशा स्पर्धांतून आपसूक मिळतात. कलेला शिस्तीची जोड ही हवीच, अत्यंत महत्वाची आहे ती!आणि त्याची सुरुवात ही या स्पर्धांमुळे सुरु होते.

मग मी ज्या स्पर्धेला गेलो होतो अशा शेकडो बेशिस्त स्पर्धा बंद पडणारच. त्यात मुळात हेतूच नाटकाचा उद्धार करण्याचा नसल्याने त्या बंद पडल्याने कोणाला फरकही पडणार नाही.त्या येत जात राहणार.

पण एक नक्की, की या स्पर्धेमुळे माझी एकांकिकांबरोबर पुन्हा ओळख झाली. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर आपण यापासून ठरवून लांब राहिलो, हे पुन्हा जाणवलं. ‘ नाटक  म्हणजे दीर्घांक किंवा दोन अंकी, ही डोळ्यावरची झापडं उतरली. हा नाट्यप्रकार स्पर्धांपुरता सीमित ठेवता त्याच्याकडे नाटकाचाच  एक भाग म्हणून बघायला पाहिजे. काही काही विषय असे असतात की त्यांचा जीव चाळीस मिनिटांचाच असतो. पण केवळ त्याची एकांकिका होईल त्यामुळे दुसरं काहीतरी बघू, अशा भावनेमुळे त्याच्याकडे आता दुर्लक्ष केल्यासारखं वाटतं  चांगल्या, वेगळ्या विषयांवरच्या एकांकिका बसवून त्यांचे एकत्रित प्रयोग लावणं पण गरजेचं आहे. त्यानेही एक जगावेगळा अनुभव देता येणं  शक्य आहे.

पुढे पुढे जात राहिलं पाहिजे हे खरं आहे. पण एकांकिका करणं म्हणजे मागे येणं नाही.आणि आपली जिकडून सुरुवात झाली, तीच विसरून कसं चालेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा