बऱ्याचदा आपण ( खरंतर आपले आईवडील ) असं म्हणतो कि बाहेर कितीही पाणी-पुरी
बर्गर हे खाण आवडत असलं तरी एका टप्प्यावर त्याचा कंटाळा येतोच आणि घरच्या वरण
भाताचं पौष्टिक अन्न खावंसं वाटतं. खरंच ! आपण दुर्लक्ष करतो पण पौष्टिक अन्न किती
महत्वाचं असत आपल्या प्रकृतीसाठी आणि शरीराची यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी ! हेच
सूत्र कलेच्या बाबतीत हि तंतोतंत लागू होतं. बिनडोक मसालावाले आणि व्यावसायिक
सिनेमे पाहून कंटाळा येतोच. मग आपलं आरोग्य ( कलेचं ) योग्य राखण्यासाठी आपण काय
करतो तर चांगले आशयघन चित्रपट-नाटकं बघतो. चांगलं चांगलं साहित्य वाचतो,
वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय घटकांचा अभ्यास करतो आणि त्यातूनच समृद्ध
होत राहतो. हे असं वाचनाचं वगैरे काम काही वेळा कंटाळा आणणारं असू शकत. पण ते
तेवढंच महत्वाचं हि असत. मग जर असंच पौष्टिक साहित्य म्हणजे कथा-कविता-लेख-नाटकं-निबंध
आपल्याला तेवढ्याच आकर्षक-देखण्या-सुश्राव्य म्हणजे थोडक्यात ‘प्रयोग’ स्वरुपात
कोणी ऑफर केली तर? म्हणजे काही लोकांनी एकत्र अनुभवायचं आणि त्यावर चर्चाही करायची
! पुण्यातली आसक्त हि नाटकाची संस्था अगदी अशाच प्रकारचा उपक्रम गेले वर्षभर
“रिंगण” या नावाने चालवते आहे.
रिंगण चा कार्यक्रम दर महिन्याच्या
दुसऱ्या शनिवार-रविवार सुदर्शन रंगमंच इथे न चुकता होतो. इथे पूर्वीच्या आणि
आजच्या अनेक दर्जेदार साहित्यकृतींची अभिवाचनं आणि सादरीकरण होतात. आजच्या
सांस्कृतिक-सामाजिक वास्तवाचा अर्थ लावणारे लेख-कविता-कथा-नाटके वाचली जातात.
पुण्यातील काही निवडक नाटकातील आणि इतरही कलाकार व प्रेक्षक मंडळी नियमाने हजेरी
लावतात. आत्तापर्यंत रिंगण मध्ये अतुल कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अमृता सुभाष,
ज्योती सुभाष, प्रिया बापट, माधुरी पुरंदरे, तुषार दळवी, किशोर कदम, अतुल पेठे, चिन्मयी
सुमित, मोहित टाकळकर अशा नामवंत कलाकारांसह अनेक कलाकार-अभिनेत्यांनी सादरीकरणे
केली आहेत. इथे दि.बा.मोकाशी, पु.शी.रेगे, जयंत पवार, कमल देसाई, सुधन्वा
देशपांडे, भूषण कोरगावकर, महेश एलकुंचवार, विद्याधर पुंडलिक अशा दिग्गज
साहित्यिकांचे साहित्य वाचले अथवा सादर झाले आहे. तसच इस्त्रायल-गाझा संघर्षावर
एकमेकांना उत्तरादाखल लिहिल्या गेलेल्या नाटिकांचे अभिवाचन झाले. त्यानंतर त्या
मुद्द्यावर सविस्तर चर्चाही झाली. नागराज मंजुळे यांनी उन्हाच्या कटाविरुद्ध या
आपल्या कवितांचे वाचन केले आहे. तसच प्राची दुबळे यांनी आदिवासींच्या गाण्यातील गोष्टींवरचा
कार्यक्रम सादर केला. विसाव्या शतकातील कलांमध्ये उमटलेल्या स्त्रीप्रतीमेचा
अभ्यास केलेल्या शोधनिबंधाच वाचन झालंय. आणि असं अजून खूप खूप काही ! या
अभिवाचनांना कानाबरोबर डोळे हि तृप्त व्हावेत अशी नेपथ्य, रचना, संगीत, वेशभूषा,
दिग्दर्शन, प्रकाशयोजना या घटकांची व्यवस्था असते. त्यामुळे एकंदरीतच हे सादरीकरण
आकर्षक आणि देखणं सुद्धा होतं. एखाद्या नाटकाचा प्रयोग बघितल्यासारखच वाटतं. त्याचा
रसरशीतपणे अनुभव घेता येतो. एखाद्या साध्या वाचनाच्या कृतीला इतक्या सौंदर्यपूर्ण शैलीत
आणि तरीही मिनिमलीस्टीक पद्धतीने मांडणं हे आयोजकांचं खरोखर कौशल्य आहे. मी तरी
असा उपक्रम या आधी कुठे पाहिलेला नाही. त्यामुळे तळमळीने हा लेख लिहावासा वाटला.
यामुळे आणखीही अनेक गोष्टींना चालना
मिळते. मुख्य म्हणजे ( केवळ साहित्यापासून दूर जाणाऱ्या लोकांकरिता) साहित्याचं
महत्व वारंवार अधोरेखित होत राहतं. विशिष्ट लेखकाशी संवाद साधायला मिळतो.
वाचनानंतर लगेचच त्यावर चर्चा घडून आल्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. लेखकाची
भूमिका समजते. निर्मितीप्रक्रियेविषयी उहापोह होतो. त्या विशिष्ट कलाकृतीचं
सामाजिक-सांस्कृतिक महत्व आणि स्थान कळण्यास मदत होते. त्या त्या काळातील संदर्भ लागतात.
आणि हे सगळं अर्थातच त्या त्या विषयाचा अभ्यास असलेल्या गाढ्या अभ्यासकांच्या
सान्निध्यात होत असत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी कि नाटक सोडून इतर
साहित्यप्रकारांची नाटक करणाऱ्यांना आणि त्याबरोबर इतरांनाही ओळख होत राहते. कारण
प्रत्येकाला हातात पुस्तक धरून वाचणं जमतंच असं नाही. त्यामुळे एखाद्या कथेतील
भाषा, संवाद, लेखकाची शैली याबाबत त्यांचाही विचार होतो. ते सादर करताना नेमकं
त्याचं काय होतं हे समजतं. त्यातील प्रयोगमुल्याची पडताळणी होते. आपण त्या लेखकाचं
इतर साहित्य वाचण्यास प्रवृत्त होतो. आणखी एक असंही घडतं कि सुरुवातीला व्यक्तीची,
त्यानंतर नाटकाच्या ग्रुप ची आणि त्या अनुषंगाने प्रेक्षकांची अभिरुची संपन्न होत
जाते. नेमकं काय पौष्टिक ? काय जंक फूड ? हे आपलं आपल्यालाच कळू लागतं. एका
चांगल्या अर्थाने आपण स्वतःची, आपल्या आजूबाजूच्या घटनांची समीक्षा करू लागतो. बघा
! नाटकालाच समांतर जाणारा असा एखादा उपक्रम सातत्याने प्रामाणिकपणे चालू ठेवला तर
काय काय होऊ शकत?
अशीच आणखी दोन उदाहरण ! नाटक कंपनी या संस्थेने
हि असाच एक कार्यक्रम चालू केलाय – दर्शन ! भारतातील विविध प्रदेशातील संगीताची,
लोककलेची ओळख म्हणजे दर्शन. दुसरं एक मोठं उदाहरण - माधुरीताई ( माधुरी पुरंदरे )
गेली दहा वर्षं सलग दर महिन्याच्या पहिल्या रविवारी असाच एक व्हिजुअल आर्ट लिटरसी
( दृश्य कला साक्षरता ) ला वाहिलेला उपक्रम घेत असत. तो प्रेक्षक संख्या खूपच
रोडावल्याने ३ महिन्यापूर्वी बंद झाला. त्यामध्ये रेनेसांस च्या काळापासून
उत्तराधुनिक काळापर्यंत झालेल्या अनेकविध महत्वाच्या चित्रकार आणि शिल्पकारांवरचे माहितीपट दाखवले
जात होते. आपल्याला माहित असलेल्या युरोपियन-अमेरिकन चित्रकारांशिवायहि अनेक
भारतीय-पौर्वात्य चित्र-शैली आणि चित्रकारांची माहिती मिळत होती. तो हि असाच एक
ग्रेट उपक्रम होता. दरवेळी काहीतरी पूर्णपणे नवीनच बघायला मिळत असे ज्याचा अभ्यास
माधुरीताइंनी पूर्वीच केलेला असायचा. पण आता लोक आपापल्या घरी नेटवर सहज ह्या
फिल्म्स पाहू शकतात म्हणून म्हणा किंवा आर्थिक अडचणींमुळे पुरेशा लोकांपर्यंत
पोचता येत नसल्यामुळे म्हणा ते शेवटी बंद झालं. पण इथे हे सांगायचा मुद्दा हा कि
आर्थिक अडचणी रिंगण लाही येत आहेतच. नाण्याला हि दुसरीहि बाजू आहेच. रिंगण सारखा
चांगला इनिशियेटीव्ह सतत चालू राहावा यासाठी काही मदत उभी राहते आहे का हे पहायला
हवं. आपण स्वतःहून जमल्यास काही करायला हवं. कारण आपलं आरोग्य राखायला आपली आई
किंवा डॉक्टर महत्वाचे असतात तसे कलाकारही असतातच त्यामुळे त्यांनी केलेल्या या
प्रयत्नांना आपण किमान उपस्थित राहून दाद द्यायला हवी. त्याबद्दल बरी – वाईट चर्चा
करायला हवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा