मुंबईतली संध्याकाळ मला फार आवडते. एक
प्रकारचा निवांतपणा तिथे असतो. कामाची धांदल संपलेली असते. ऊन उतरलेलं असतं.
त्यातून जुहुतली आणि विशेषतः पृथ्वी थिएटरमधील संध्याकाळ तर विशेष सुंदर वाटते.
‘माहोल’ असं आपण ज्याला म्हणू शकतो अगदी तसं वातावरण.मी तिकिटाच्या रंगेत उभी होते.
तिथल्या एक पारावर दोन बायका गप्पा मारत बसल्या होत्या. अत्यंत जबरदस्त म्हणाव्या
अशा दोघी. त्यातील एक म्हणजे समीक्षक, लेखिका शांता गोखले आणि दुसऱ्या म्हणजे
ख्यातनाम नाटककार वीणापाणी चावला. वीणापाणींविषयी खूप ऐकलेलं होतं. त्यांना
प्रत्येक्ष पाहणं काही वेगळंच होतं. अनेक प्रतिभावान माणसांना पाहिलं की त्यांच्या
आजूबाजूला असलेल्या वलयात उभं असल्यासारखं वाटतं. एक वेगळीच उर्जा जाणवते. तसंच
वीणापाणी तिथे असताना वाटत होतं. त्यांना मी बराच वेळ निरखत होते. मग शांताताईंनी
बोलावून घेतलं. मी त्या दोघींच्या जवळ गेले. शांताताई वीणापाणींवर पुस्तक लिहित होत्या, त्या संदर्भात त्यांची
चर्चा चालू होती. शांताताईंनी ओळख करून दिली. मी म्हणलं मला खूप इच्छा आहे
आदिशक्तीला यायची, तुमचं वर्कशॉप करायची. वीणापाणी हसल्या आणि म्हणल्या नक्की ये
या वर्षी.. मला त्या दोघींकडे पाहून खूप उर्जा जाणवली. खूप शांत आणि सुखद अशी ती
भेट होती.
त्या दिवशी ‘निद्रावथम’ नावाचं
आदिशक्ती निर्मित नाटक पाहायला मिळणार होतं. ‘आदिशक्ती’ या
संस्थेविषयी खूप ऐकलेलं होतं. पण त्यांची कलाकृती पाहायची पहिलीच वेळ होती. मी आत
जाताना कोण कलाकार काम करणार आहेत ते पाहिलं, निम्मी राफेल असं एकच नाव त्यात
दिसलं. प्रयोग एकपात्री होता. प्रयोग सुरु झाला. लक्ष्मण आणि कुंभकर्ण
यांच्याविषयीचं नाटक होतं. झोप न घेता सतत जागं राहण्याचं वरदान लाभलेला रामाचा
भाऊ लक्ष्मण आणि अपार झोपेचं दान असलेला रावणाचा भाऊ कुंभकर्ण, यांच्याविषयी नाटक
होतं. त्या दोघांसाठी ‘झोप’ हे वरदान न राहता हळू हळू शाप ठरत जातो. त्यांच्या या प्रवासाचं
आगळं दर्शन घडवणारं हे नाटक होतं. अत्यंत नेटक्या हालचाली, आखीव - रेखीव भाव, चपखल
प्रकाशयोजना, आणि निम्मीचा अभिनय इतक्या गोष्टी नाटकात होत्या. नेपथ्य आणि इतर वस्तू,
अति मेकअप, भावखाऊ वेशभूषा, असं काही नव्हतं. त्या अभिनेत्रीचं शरीर हेच
केंद्रस्थानी होतं. तिनं केलेली प्रत्येक हालचाल, मग अगदी बुबुळापासून, भुवई, पायाची
बोटं, सूक्ष्म आवाज, अगदी बारीकातील बारीक गोष्टींकडे लक्ष जात होतं. एक प्रसंग
असा होता ज्यात ती लक्ष्मण आणि कुंभकर्ण यांच्यातील संवाद अभिनयाद्वारे दाखवत
होती. झटक्यात ती लक्ष्मण असायची आणि क्षणात कुंभकर्ण ! दोन्ही अगदी वेगळ्या
व्यक्तिरेखा. आणि शब्द अगदी कमी, नाहीतच जवळपास. केवळ शारीरिक हालचाली, आणि अद्भुत
भाव ! जबरदस्त अनुभव ! या प्रकारचं नाटक मी याआधी पाहिलं नव्हतं. मी भारावले. आपण
जिथे ही माणसं काम करतात तिथे गेलं पाहिजे, या प्रकारच्या नाटकाची प्रक्रिया
समजावून घेतली पाहिजे, असं वाटू लागलं. निश्चय केला, काहीही झालं तरी तिथे जाऊन
यायचं.
आणि आक्रीत घडलं.... नोव्हेंबर
महिन्यात वीणापाणी गेल्या... धक्काच बसला.... मनाला खूप रुखरुख लागून राहिली. त्या
असताना आदिशक्तीला जाता आलं नाही याची....फेब्रुवारी महिन्यातील कार्यशाळेला मी गेले.
पाँडीचेरी जवळ एका गावामध्ये ! ... एक छोटं फाटक उघडलं, बाहेर एका लाकडी फलकावर ‘आदिशक्ती
थिएटर’ असं लिहीलेलं होतं. फाटकातून आत गेले, तर सर्वत्र स्वच्छ रेती होती. खूप
मोकळी जागा होती. आत गेल्या गेल्या एक दुमजली इमारत होती. मग थोडं पुढे गेल्यावर
दोन-तीन सुबक घरं होती, मग एक मोठा जेवणासाठी बांधलेला हॉल होता. परत काही छोट्या
इमारती होत्या. वीणापाणी राहायच्या ते घर होतं. त्या वातावरणात योग्य वाटतील असेच
रंग तेथील घरांना होते. एक पोहण्याचा तलाव होता, आणि मग एक अतिशय सुंदर, अवर्णनीय
असं एक थिएटर होतं. सुबक आणि नेटकं असं. लाकडी स्टेज, नेटका प्रकाश, बसायची
व्यवस्था, सर्व काही ‘पवित्र’ वाटत होत. या ठिकाणातील कुठलीच गोष्ट अंगावर येत
नव्हती, कुठलीच गोष्ट अति अत्याधुनिक वाटत नव्हती, तिथले रंग, तिथले पोत, तिथल्या
वातावरणानुरूप, संस्कृतीनुरूप होते. इथेच कायम स्थायिक होता यावं, असं वाटायला
लावणारं हे ठिकाण होतं.
आदल्या दिवशी कार्यशाळेचा आवाका
समजावण्यात आला. सकाळी ७ ते रात्री ९:३० अशी कार्यशाळेची वेळ होती. सकाळी ७ ते
७:३० - डोळ्यांचे व्यायाम. ७:३० ते ८ - शरीरातील ‘चक्र’ समजावून घेणं. ८ ते ९ - कलरीपयात्तु.
९ ते १० - नाश्ता. १० ते १२ - आवाजावर काम, १२ ते २ - भावना म्हणजेच emotions वर
काम, मग जेवणाच्या सुट्टी नंतर ३ ते ४ - संगीताचा वर्ग, ५ ते ६ – पोहायचा तास, आणि
मग ७ ते ९:३० ताल, नाद आणि संहिता यावर काम, अशी दिवसभराची रूपरेषा पाहून मी हरखून
गेले. कुठल्याही अभिनेत्याला/अभिनेत्रीला याहून मोठी शिक्षणाची आणि स्वतःवर इतकं
काम करण्याची संधी परत मिळणं अशक्य होतं.
संवादात डोळे अत्यंत महत्वाचे असतात,
त्याचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. त्यासाठीचे व्यायाम शिकवले गेले. उर्जा आणि
जाणिवेशी निगडीत सात चक्र आपल्या शरीरात आहेत. त्यांचा अभ्यास केला गेला. ‘कलरीपय्यातु’
हा केरळातील व्यायाम/युद्ध प्रकार आहे. त्यातील व्यायाम प्रकार हे एकाग्रता,
लवचिकतेच्या, शरीर विषयक जाणीव समृद्ध करण्याच्या दृष्टीनी खूप उपयोगी आहेत.
कलरीपय्यातुचे वर्ग जमिनीपासून थोड्या खोल असलेल्या चौकोनात घेण्यात आले. या
जागेची उर्जा अद्भुत होती. श्वास कसा घ्यायचा, तो कुठून घ्याचा, कसा घ्यायचा,
श्वास कुठून घेतल्यावर काय प्रकारचा आवाज उत्त्पन्न होतो, श्वासाचा आणि आवाजाच्या
पट्टीचा कसा संबंध आहे, आवाज लहान/ मोठा करून योग्य तो वापर कसा करायचा - या
साऱ्यासाठी आवाजाचा वर्ग असायाचा. शरीरातील कुठल्या स्नायूंची विशिष्ट हालचाल
केल्यावर कुठला भाव तयार होतो हे कळण्यासाठी, अभिनेत्यांना नवरस तयार करता यावेत;
याची पद्धती काय असावी यासाठी भाव-रस हा वर्ग. संगीताच्या वर्गात मिझावू /मेलावू
/जेंबे या वाद्यांवर ताल वाजवायला शिकवले. तीन लयी समजावून दिल्या. आम्हाला ताल अगदी
प्राथमिक का होईना वाजवता येऊ लागले. पाण्यात/ पोहताना श्वासावर जास्त काम करता आलं.
तसंच अभिनयात ‘नाद’, ‘ताल’ किती महत्वाचा असतो. शब्दांमधील, वाक्यांमधील,
हालचालींमध्ये, भावनांमधील ‘नाद’ समजावण्यात आला. अभिनय करताना शब्दांसोबत शारीरिक
अभिव्यक्तीही खूप महत्वाची आहे. लय, ताल, गती, उच्चार, तंदुरुस्ती, भाव इ. क्षमता
फार महत्वाच्या आहेत.
अभिनेत्याला ‘आतून’ काही वाटेल आणि मग
ते त्याच्या सादरीकरणात येईल, हे एकदा होईल, दोनदा होईल, पण दरवेळी अपेक्षित
असलेला भाव, त्याला ‘आत काही वाटून’ येणं शक्य नाही, त्यासाठी अभिनेत्याला/
अभिनेत्रीला हव्या त्या क्षणी भाव तयार करण्याचं तंत्र अवगत झालं पाहिजे. अभिनय
करताना अभिनेत्यानी भाव अनुभवणं हे महत्वाचं नसून, प्रेक्षकांना त्या भावना पोचणं
महत्वाचं आहे. हुकुमत असलेलं तंत्र फार महत्वाचं आहे. आपल्याकडील अभिनयाची बरीचशी
तंत्र ही पाश्चिमात्य प्रभावातून बनवली गेली आहेत. मात्र कुडीअटटम, कलरीपाय्यतु,
धृपद गायकी, प्राणायाम, आसनं इत्यादी कलाप्रकारातील तंत्रांचा अभ्यास करून वीणापाणींनी
स्वतःची अशी भारतीय वेगळी पद्धत तयार केली. संशोधन केलं. ‘आपली’ पद्धत तयार केली.
स्वतःच्या सादरीकरणाची आपली एक भाषा असावी, आत्ताच्या काळाशी ती सुसंगत असावी, सौंदर्यपूर्ण
अभिव्यक्ती असावी, परंपरेशी संबंध ठेवत, परंपरेचे समकालीन अर्थ शोधता यावेत यासाठी
आदिशक्ती प्रयत्नशील आहे. या सगळ्यात कुठलाही खोटेपणा, झगमगाट, दिखाऊपणा नाही.
असलं तर नाटक या माध्यमाविषयी अफाट प्रेम, निष्ठा आणि गांभीर्य आहे.
ठरवून एक अख्खा अभ्यासपूर्ण निबंध
लिहावा इतका अनुभवाचा साठा मिळाला. अर्थात सततच्या तालमी करूनच या तंत्र पद्धती
अवगत होऊ शकतात आणि चिकाटी, मेहनत आणि संयम, या प्रकारच्या कामाला अभिप्रेत आहेत.
मी एकदा निम्मीला विचारलं की आदिशक्तीत इतके मोजके अभिनेतेच कसे आहेत. इतर अभिनेते
का नाही सहभागी होत, त्यावर ती म्हणाली वीणापाणींना अत्यंत निष्ठावान अभिनेते लागत
असत. एक आठवडा आलोय, दोन महिने आलोय, पाच महिने आलोय, असं त्यांना चालायचं नाही.
काही वर्षांचा रियाझ, त्यांच्या या प्रकारच्या कामाला अभिप्रेत होता. तो करायला,
इतका वेळ द्यायला कोणी तयार होत नाही. लोकं पळून जातात. म्हणून इतके मोजके
अभिनेते. समर्पण आणि सातत्य हा आदिशक्तीचा गाभा आहे. वीणापाणीनंतर विनय कुमार,
निम्मी राफेल, अरविंद राणे, भावीन पटेल ही मंडळी अत्यंत समर्थपणे आदिशक्ती चालवत आहेत.
वीणापाणींचं काम पुढे नेत आहेत.
आजच्या काळात नाटक करत असताना
गोंधळल्यासारखं होतं. सिनेमा, टी.व्ही. यांचा हा काळ असताना, नाटक करणं हे
काळासोबत चालणं आहे नां हा प्रश्न पडतो. नाटक केल्याने नेमकं काय होतं? ना पैसे
मिळतात, ना प्रसिद्धी मिळते, आणि नाव मिळायला खूप वर्ष लागतात. पण नाटक आपल्या
जगण्याला एक सातत्य देतं, एक सच्चेपणा देतं, खरं राहण्याचं बळ देतं, लोकांना सामोरं
जाण्याचं बळ देतं. भारतात कान्हाईलाल, सावित्री देवी, रतन थिय्याम, हबीब तन्वीर, बादल
सरकार, सत्यदेव दुबे, बी.जयश्री यांच्यापासून
मालयश्री हाश्मी, सुधन्वा देशपांडे, अतुल पेठे, अतुल कुमार, सुनील शानबाग यांसारखे
अनेक नाटककार नाटक करत राहण्याला एक महत्व प्राप्त करून देतात. वीणापाणी चावला आणि
विनय कुमार, निम्मी राफेल, हे सर्वजण, नाटक या गोष्टीच्या मुळाशी जायला भाग पाडतात.
आजच्या जगात त्याचं महत्व, त्यातील गांभीर्य आणि त्यातील मजा आपल्याला जाणवून
देण्याचं मोलाचं काम करतात.
-- पर्ण पेठे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा