२.४.१५

यात कसला अपमान?

काही वेळापूर्वी फेसबुकवर एकाने लिहिलेलं वाचलं – ‘BBC should make a documentary named ENGLAND’S SLAUGHTER’. काही वेळाने कळलं की हा संदर्भ क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडचा बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा होता. ते जरी असलं तरी पहिला संदर्भ हा ‘India’s Daughter’ चाच होता. त्यानंतर मी असे अनेक स्टेटस वाचले. काहींनी तर त्या माहितिपटच्या दिग्दर्शिकेला उद्देशून पत्र लिहिली होती.अगदी आकडे देऊन मुद्देसूद पत्र.त्यामध्ये असं काहीसं लिहिलं होतं, की कसे इंग्लंड-अमेरिकेमध्ये भारतापेक्षा जास्त बलात्कार होतात वगैरे वगैरे.म्हणजे 'आधी स्वतःचं बघा, आम्हाला शिकवायला येऊ नका!'थोडक्यात काय, तर देशाभिमान दुखावला गेला होता.एका वृत्तपत्राने तर हा माहितीपट करताना त्या दिग्दर्शीकेने आणि तिच्या कंपनीने कसे गैरप्रकार केले होते यावर सविस्तर, तपशीलवार लेख लिहिला होता. आपल्या सरकारने तर त्याच्या प्रक्षेपणावरच बंदी घातली. या सगळ्यामुळे बाकी काही घडलं नसेल, पण एरवीपेक्षा जास्त लोकांनी तो माहितीपट पाहिला हे मात्र नक्की!

मी पण तो माहितीपट नुकताच पाहिला.चांगलावाईट हे वैयक्तिक मत झालं. त्याबद्दल काही बोलायला नको.पण प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी मिळतंच!तर या कलाकृतीतून अपराध्यांपैकी एकाचे विचार आणि त्याचबरोबर त्यांच्या वकिलांचेही विचार कळले.१६ डिसेंबेरला जे घडलं ते निःशंक घृणास्पदच होतं.चीड आणणारं होतं.आणि कोणालातरी अपराध्यांची बाजू घ्यावीशी वाटली आणि नंतर आपल्या भूमिकेबद्दल ठाम रहावासं वाटलं हे पाहून धक्का बसला. सगळ्यांनी पुरोगामीच असावं हे तर शक्य नाही, पण त्यांचे विचार ऐकून, आणि त्या विचारनिर्मितीची प्रक्रिया पाहून स्तब्ध व्हायला झालं.

पण एक गोष्ट मला अजून कळली नाही ती ही, की या माहितीपटाला इतका विरोध का?आणि हा माहितीपट पाहून तर अजूनच विचारात पडलोय.म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आपल्याकडे नाही, हे तर आता कळून चुकलंच आहे.पण या माहितीपटात असं काय आहे की त्याला विरोध व्हावा?आणि तो ही इतका!म्हणजे थेट सरकारने त्यावर बंदी आणावी!आणि त्या बंदीचं समर्थन हे असं फेसबुकवर लोकांनी करावं.आधी मला वाटायचं की याचा संबंध थेट शिक्षणाशी आहे.जसा शिक्षित वर्ग वाढेल, तसं हे कमी होईल.पण फेसबुक वापरू शकतायेत म्हणजे किमान शिक्षण तर झालंच असणार!

त्यापलीकडे जाऊन माझं म्हणणं असं आहे की जी वस्तुस्थिती आहे ती का मान्य करवत नाही?१६ डिसेंबरला ही घटना घडली हे खोटं आहे का?मुकेश नावाच्या अपराध्याचे जे विचार आहेत हे खोटं आहे का?त्याच्या वकिलांचे जे विचार आहेत ते खोटं आहे का?जे खरं आहे ते मान्य केलंच पाहिजे!त्याची एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, एक पुरुष म्हणून लाज वाटत असेल तर वाटलीच पाहिजे!आणि या बाबतीत आपण खरंच काही देशांच्या बरेच मागे आहोत हे ही मान्य केलंच पाहिजे.जर्मनीमध्ये हिटलरच्या काळचे ‘concentration camps’ अजूनही टिकवून ठेवले आहेत. त्या जागा तर नीचपणाचं सगळ्यात मोठं प्रतीक आहेत.’या जागा टिकण्यामागे खरंतर अमेरिका आहे वगैरे वक्तव्य केली जाऊ शकतात, पण वस्तुस्थिती ही आहे की तिकडे सगळ्यांनी त्यांचा हा इतिहास मान्य केला आहे.

माहितिपटाचं प्रक्षेपण व्हायच्या आधीच लोकांनी त्याला नावं ठेवायला सुरुवात केली, त्याच्या विरुद्ध लिहू लागले, चर्चा होऊ लागल्या!आणि नेमका मुद्दा काय आहे, कशामुळे इतके चिडलेत हेच कळेना!ज्या बाईने दिग्दर्शित केली ती भारतीय नाही म्हणून की आपल्या देशाची जागतिक पातळीवर मानहानी झाली म्हणून?आणि यामुळे खरंच झाली का मानहानी?हा माहितीपट तिला का करावासा वाटला याचा थोडं थांबून कोणी विचार केला का? का केला असेल हा माहितीपट?एक सामुहिक बलात्कार झाला म्हणून?विकृत पद्धतीने तिला जखमा केल्या म्हणून? त्यामुळे त्या मुलीचा मृत्यु झाला म्हणून? हे लिहिताना अत्यंत लाज वाटते, पण हे असं काही घडायची ही पहिली वेळ नव्हती, आणि शेवटचीही नाहीये.या आधी आपल्याकडे, अगदी पुण्यात, नयना पुजारी केस झाली आहे.  यानंतरही बदाऊन मध्ये असे प्रकार झालेच आहेत!

तो माहितीपट पाहून मला असं वाटतं की तो करावसं वाटला कारण त्यानंतर जी उत्स्फुर्त लोकप्रतिक्रिया होती ती जगावेगळी होती.अख्ख्या जगाचं लक्ष ओढवून घेणारी होती.लोकशाही अजूनही इकडे जिवंत आहे हे दाखवून देणारी होती.हे झाल्या झाल्या देशभर, खास करून दिल्लीत निदर्शनं झाली जी खरोखर भावनिक होती.लोकांना याबद्दल काहीतरी ठोस घडावं असं खरंच मनापासून वाटत होतं.इतर कोणताही सुप्त हेतू नव्हता.आणि हे विलक्षण होतं!त्यामुळे या घटनेला इतकं महत्वं मिळालं.

जे झालं त्याच्या विरुद्ध खवळून उठणं बरोबरच आहे, पण ते का झालं याचाही विचार होणं गरजेचं आहे.हा फक्त लैंगिक भूक शमवण्याचा प्रकार होता का?हे कळण्यासाठी त्या अपराध्यांशी, त्यांच्या वकिलांशी, जेलमधल्या मानसोपचार तज्ञांशी बोलणं गरजेचं आहे.त्यांचे विचार समजणं गरजेचं आहे.आणि हे सगळं माहितीपटाने नक्की केलं.मुकेश,पवन,अक्षय,राम,विनय आणि तो १८ वर्षांखालील तरुण यांच्याबद्दल जास्त माहिती मिळाली.कुठे रहात होते, कसे रहात होते, एरवी काय करायचे, त्यांचं कुटुंब कसं होतं इत्यादी.हे सगळं वाचून माहिती होतंच, पण ते दृश्य स्वरूपात पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे.हे दाखवताना कोणीही त्यांची बाजू घेत नाहीये!आणि तशी कोणाचीच अपेक्षा पण नाहीये.

काही लोकांचं असं म्हणणं होतं की भारतीय पुरुषाचा, त्याच्या मानसिकतेचा जागतिक पातळीवर अपमान झाला.त्याच्या जोडीला मग नुकताच घडलेला तो जर्मनीतल्या प्राध्यापकाचा किस्सा सांगितला जातो.त्याने एका भारतीय तरूणाला internship द्यायची नाकारली आणि असं कारण दिलं की आपल्याकडे बलात्काराची संस्कृती आहे.मग या घटनेमधून सगळ्या जर्मन लोकांच्या मानसिकतेबद्दल आपण बोललं पाहिजे आणि त्याच्यापुढे त्यांच्या राजदूताने त्या प्राध्यापकाला एका जाहीर पत्रातून चांगलं झोडपलं याकडे कानाडोळा केलं पाहिजे. त्यामुळे या मुद्द्याशी मी सहमत नाही!मानहानी झाली असेल तर ती त्या अपराध्यांची आणि त्यांच्या वकिलांची झाली आहे, जी रास्त आहे.

India’s daughter’ या नावाबद्दल आक्षेप आहे का मग?आता पुन्हा प्रत्येक कलाकृतीची जी एक समस्या असते ती इथे उद्भवते - प्रेक्षकाचा दृष्टीकोन.जर असा दृष्टीकोन असेल की या नावाचा अर्थ म्हणजेभारतातल्या मुलींचं एक प्रतीक तर त्याचा असाही अर्थ असू शकतो कीसर्व भारतीयांनी जिला आपली मुलगी मानलं ती.एकंदरीत त्या घटनेनंतर पेटलेल्या सगळ्यांच्या भावनांनंतर, ती खरोखरच आपलीच कोणीतरी आहे असा भास झाला होता.हो की नाही?

आणि आपण अत्यंत चवीने ‘Fahreneit 9/11’ सारखे माहितीपट बघतोच की!ते चालतं!बघताना स्तुती करायची  असा असला पाहिजे देश. सरळ त्या देशाच्या अध्यक्षांच्या छुप्या कारभाराबद्दल माहितीपट बनवला!हे सगळं ते स्वतः अध्यक्ष असताना!अशी लोकशाही असावी.’ वगैरे वगैरे.मग हे असं वागून आपणच आपल्याला मागे नेतोय. देशाची प्रगती ही त्या त्या देशाच्या माणसांच्या प्रगतीवर अवलंबून असते.माणसांची प्रगती ही फक्त आर्थिक तराजूवर तोलता येत नाही.त्यांच्या प्रगल्भतेवर पण ठरते.माणूस म्हणून आपण किती प्रगल्भ आहोत, हे फार महत्वाचं आहे.आणि माणूस म्हणून प्रगती होण्यासाठी टीका ऐकून, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, विधायक बदल घडवणं अत्यंत गरजेचं आहे. या माहितिपटाच्या संपूर्ण घटनेमुळे आपण अजून बरेच मागे आहोत हे जाणवतंय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा