२.४.१५

नाटककार सतीश आळेकर - एक ओळख (अनुज देशपांडे लिखित)

गेल्या महिन्यात पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने "नाटककार सतीश आळेकर" अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केलं होतं. आळेकरांच्या "महानिर्वाण" या बहुचर्चित नाटकाला ४० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त. तेव्हा आळेकरांच्या नाटकाची भाषा, त्यातील राजकारण, प्रयोगशीलता, आळेकरी विनोद, अभिनयाची पद्धत  तसच त्यांच्याशी सध्याच्या नाटकांचा आणि जाणिवांचा असलेला संबंध अशा अनेक विषयांवर मान्यवरांनी भाषणे केली. तसच निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित आळेकरांच्या 'एक दिवस मठाकडे' या नाटकाचा प्रयोग ही झाला. त्या तिन दिवसात झालेल्या एकूण कार्यक्रमात एवढ मात्र पुन्हा पुन्हा अधोरेखित होत होतं कि आळेकर सरांनी त्यांच्या नाटकांमधून खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग केले, आणि त्यामुळे मराठी नाटकात त्यांचं स्थान अटळ आहे.  


       आळेकर म्हणजे माझ्या आधीच्या आधीच्या पिढीचे. एलकुंचवार, गो.पु. देशपांडे या पंक्तीतले. पण तरीही त्यांची शैली, दृष्टीकोन, पद्धत अगदी फक्त त्यांच्याचसारखी. ती कोणालाही उचलता येण्यासारखी नाही. म्हणूनच कदाचित त्यांनी लिहिलेली जवळ जवळ सगळी नाटकं ते स्वतःच दिग्दर्शित करत. महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, हि त्यांची पहिल्या टप्प्यातली नाटके. तर अतिरेकी, दुसरा सामना, पिढीजात, शनिवार रविवार, मिकी आणि मेमसाहेब हि नंतरच्या टप्प्यातली. याबरोबरच त्यांनी झुलता पूल, भजन, मेमरी अशा सुमारे १० एकांकिका हि लिहिल्या. पहिल्या टप्प्यातल्या नाटकांमध्ये त्यांनी टिपलेली मध्यमवर्गाची दांभिकता, त्यातील विरोधाभास, तोचतोचपणा, कंटाळा, अस्वस्थता, स्मरणरंजन या सगळ्या गोष्टी मराठी नाटकात नवीन होत्या. तसच त्यांनी त्या ज्या नर्मविनोदी, विडंबनात्मक, आणि काहीशा absurd पद्धतीने मांडल्या ती सुद्धा लक्ष वेधून घेणारी ठरली. आजूबाजूला गोंधळात टाकणारी परिस्थिती असताना त्यांनी त्यातून काहीतरी खरोखरच विचारास प्रवृत्त करतील, आपल्या जगण्यातल्या काही अंधाऱ्या जागा प्रकाशमान करतील, व्यंग उलगडून दाखवतील, समाजातल्या चुकीच्या गोष्टींची लख्ख जाणीव करून देतील अशी नाटकं लिहिली. आणि तरीसुद्धा यातील काहीही स्पष्टपणे उघड उघड कळेल अशी संवादांची अथवा नाटकाची रचना नाही. पात्रांची नावं, रूपकं, त्यात घडत जाणाऱ्या छोट्या छोट्या घटना, एका नेणिवेच्या पातळीवर गेल्याचा अनुभव,  रोजच्या भाषेचा नाटकीय वापर हेच त्यांचं शक्तिस्थान. काही अतिशय तर्कहीन रूढी परंपरा वर्षानुवर्ष मानत असणाऱ्या कर्मठ लोकांची त्यांनी नाटकातून तिरकसपणे आणि तरीही परखडपणे तपासणी केली. नैतिक – अनैतिकतेचे प्रश्न चव्हाट्यावर आणले. आळेकरांची नाटकं नुसतीच वाचून काम भागणार नाही. त्यांच्या त्या विशिष्ट दृष्टिकोनावर परिणाम करणारे अनेक घटक त्यामागे आहेत. एक विशिष्ट सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी त्यांना आहे. ती एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. आळेकर जिथे वाढले त्या सदाशिव पेठेतील त्या काळच्या वास्तवाशी त्यांच्या नाटकाचं अपरिहार्य नातं आहे.
    महापूर, बेगम बर्वे आणि महानिर्वाण हि त्यांची अतिशय महत्वाची आणि मैलाचा दगड ठरलेली नाटकं. तरुणपणात येणार रिकामेपण, प्रेम, अस्वस्थता, ह्या सगळ्यातून येणारी एक प्रकारची विकृती हि त्याही काळात होती आणि आजही आहे. त्यामुळे 'महापूर' लोक आजही पाहतात. आणि स्वतःशी अधिकाधिक जोडून घेतात. महापूर मधल्या नायकाला त्याच्या प्रेयसी चं पोट फाडण्याची होणारी इच्छा, त्याचं विकृत आणि तरीही प्रामाणिक प्रेम, स्वातंत्र्यलढ्यातील घटनांमध्ये रमून गेलेले त्याचे आईवडील, ओव्हरफ्लो होणारी बिल्डींग ची टाकी या सगळ्या गोष्टी थेटपणे समजल्या नाहीत तरी एक अस्वस्थ करणारा अनुभव देतात. बेगम बर्वे मध्ये संगीत नाटकाच्या सुवर्ण काळात दुय्यम भूमिका करणारा एक नट ( कि नटी ?) बर्वे हा अजूनही त्याच त्या संगीत नाटकांच्या गोड स्वप्नात मदमस्तपणे लोळतो आहे. जिन्याखाली असणारं त्याचं घर, जावडेकर-बावडेकर जोडी आणि त्यांची वर्षानुवर्षांची कारकुनी, तोचतोचपणा हे रंजक आणि विनोदी शैलीत आपल्यासमोर येत राहतं आणि तरीही त्याचं गांभीर्य, खोली अजिबात कमी होत नाही. उलट माठ, जिन्याखालचा अंधार, चिवडा, या सगळ्याचे आपण आणखीही अर्थ लावायला लागतो आणि अधिक खोल अनुभव मिळवतो. महानिर्वाण तर या सगळ्याचा कळसच म्हणता येईल. चाळीतील एका माणसाचा मृत्यू झाल्यानंतर नेमकं त्याच्या घरी, आजूबाजूला काय काय घडतं, आट्या पाट्या खेळणारा त्यांचा मुलगा, वेगळ्या पुरुषाचा विचार करणारी त्यांची विधवा बायको आणि अशा कितीतरी गोष्टी मनावर खोल परिणाम करतात. आपल्या धारणा तपासून पहायला लावतात.  महानिर्वाण सहित बेगम बर्वे चे सुद्धा इतर अनेक भारतीय भाषांत अनुवाद झाले. विविध दिग्दर्शकांनी, नट संचांनी त्यांच्या नाटकातल्या गर्भित अर्थांचा शोध घेतला. स्वतः आळेकरांनी अमेरिकेत त्यांच्या नाटकाचा इंग्रजी मध्ये प्रयोग केला. त्यांच्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत फ्री फॉर्म. बेगम बर्वे मध्ये सूत्रधारच भूमिका करतो किंवा महानिर्वाण मध्ये विंगेचा वारंवार उल्लेख होतो, एक अभिनेता पहिल्या अंकाचा पडदा टाकायला सांगतो, महापूर मध्ये विंगेतून एक हात येतो ही सगळी त्याचीच उदाहरणे. पण कुठेही त्याचा अतिरेकी वापर वाटत नाही किंवा ते विसंगत ही वाटत नाही. आणि कोणाला विसंगती वाटली तर आळेकरांना ते सुद्धा अपेक्षित असतच ! त्यांचं आणखी एक ताजं नाटक म्हणजे एक दिवस मठाकडे. गिरीश कुलकर्णी अमेय वाघ आणि पर्ण पेठे यांच्या भूमिका असलेलं. आई, वडील आणि तरुण मुलाच्या नात्यातला ताण, मुलाची बापाबद्दल ची मतं आणि या सगळ्याच्याही पुढे जाऊन जेव्हा बायको अकाली गेल्यावर बापाची काय अवस्था होते, त्याला बोलायला कोणी उरतं का ? कि केवळ विलंबित मोनोलॉग च राहतो या सगळ्या चा एकत्रित अनुभव हे नाटक देत. आणखी ... ? आणखी काय बोलणार ? सतीश आळेकर यांची नाटकं अशी तोंडी सांगायला अडचण होते. त्यांचं वर्णन करता येत नाही. कारण त्यांचा असा काही ठोस विषय नसतो किंवा सलग कथासूत्र सुद्धा नसतं. असतो तो एक संपूर्ण, जगण्यातील विविध पातळ्यांवरचे पापुद्रे घेऊन आलेला, अत्यंत अस्तित्ववादी अनुभव. तो जिवंत असतो. तो त्या रंगमंचाच्या मोकळ्या अवकाशातच निर्माण होतो. शब्दांमध्ये तो पकडता येणं फार अवघड. त्यासाठी आपल्याला एकतर त्यांची नाटकं पहावी लागतील किंवा पुस्तकं मिळवून ती वाचून काही कल्पना करावी लागेल. बऱ्याच गोष्टी हाती लागतील. कारण आळेकर हे खरंच एक ग्रेट नाटककार आहेत. त्यांची नाटकातून एक सघन, जिवंत अनुभव देण्याची हातोटी अलौकिकच आहे. मागील वर्षीच ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ते सध्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे. अतुल पेठे यांनी आळेकरांच्या नाट्यलेखन कारकीर्दीवर "नाटककार सतीश आळेकर" हा माहितीपट केला. याशिवाय बेगम बर्वे आणि महानिर्वाण वर अभ्यासात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. थोडक्यात सतीश आळेकर हे मराठी नाटकामधलं एक मानाचं आणि अपरिहार्यपणे घेतलं जाणारं नाव आहे.


     त्यांनी ज्या काळात विसंगती, लोकांची संवेदनहीनता, प्रसंगी जाणवणारा रिकामेपणा, अर्थहीनता आपल्या नाटकातून मांडल्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल आता आपण केवळ अनुमान लावू शकतो. पण आज त्यांनी नाटक लिहायचं म्हणलं तर ते आजच्या विखंडीत, गोंधळात टाकणाऱ्या अधिकच असंगत, अर्थ गमावत चाललेल्या वास्तवाकडे कस बघतील हि उत्सुकता वाटते आहे.


--        अनुज देशपांडे
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा