२.४.१५

विनोद दोशी

 काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये विनोद दोशी यांच्या स्मृति पृत्यर्थ देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा समारंभ पार पडला.वर्षातला हा एक असा दिवस असतो जेव्हा मुम्बई-पुणेचे बहुतेक नाटकवाले एकत्र, एका जागी येतात.अगदी अनौपचारिक असा सोहळा असतो, ते ही एक वेगळेपण!
  काही वर्षांपूर्वी मला जेव्हा ही शिष्यवृत्ती मिळाली तेव्हचा दिवस आठवला.जानेवारितल्या एका सकाळी सतीश अळेकरांचा फोन आला.त्यांनी त्यांच्या ख़ास शैलीत विचारलं 'काय झोपेतून जागं केलं का?' मग थोडं इकडचं तिकडचं बोलून मला म्हणाले 'तुला या वर्षीची एक विनोद दोशी शिष्यवृत्ती देणार आहोत.घेणार का?' आनंदाने हसू की त्यांच्या विनोदवार हसू कळलं नाही!
दर वर्षी, विनोद दोशींच्या नावाने 5 लोकांना शिष्यवृत्ती देतात. ही लोकं कलेच्या क्षेत्रात आशास्वक काम करणारे तरुण असतात. शिष्यवृत्तिचं स्वरुप पण एकदम सरळ सोट आहे.काही आढ़े वेढे नाही!ज्याला शिष्यवृत्ती मिळते त्याला एक लाख रुपये दिले जातात.मग यामध्ये त्याने त्यावर्षात अमुक अमुक केलंच पाहिजे किंवा वर्षअखेरीस त्या पैश्यांचा हिशोब द्यायला पाहिजे वगैरे काही नाही!ती शिष्यवृत्ती म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामाचं बक्षीस आहे.येत्या वर्षात कोणतीतरी मनोकामना पूर्ण करायची असेल तर त्यासाठीचा हातभार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ही शिष्यवृत्ती सर्वार्थाने उत्तेजन देणारी आहे!
याचा जो सोहळा असतो त्याचे स्वरुपही वेगळे आहे.त्यादिवशी काहीही झालं तरी व्यासपीठावरून आयोजकांचे आभार मानायचे नाहीत अशी एकच अट घातली जाते.उलट प्रत्येक विजेत्याने त्याला दिलेल्या 5-10 मिनिटांत प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करावी, असं सांगितलं जातं.त्यामुळे कार्यक्रमाचं स्वरुपही वेगळ राहतं.नेहमीच्या भाषणबाजीपेक्षा खरंच काहीतरी वेगळ बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. या शिष्यवृत्तीबरोबरच पाच नाटकांचा एक महोत्सव पण आयोजित केला जातो.देशभरातली दरजेदार नाटकांना आमंत्रण दिलं जातं आणि त्याचबरोबर पुण्यातील एका संघाला नवीन नाटकासाठी आर्थिक हातभार दिला जातो. रसिक पुणेकर या महोत्सवाची अगदी आतुरतेने वाट पाहतात.
 खरंतर या सगळ्याचा जो स्त्रोत आहे त्याच्याविषयी मला बोलायचं आहे. आणि ही एवढी सगळी प्रस्तावना देण्यामागचं कारण इतकंच की हे सगळ माझ्यामतेतरी विलक्षण आहे, त्यामुळे याचा जो स्त्रोत आहे तो ही नि:संशय विलक्षण असलाच पाहिजे!या शिष्यवृत्तीची कल्पना जरी विजय तेंडुलकर,अशोक कुलकर्णी आणि इतर लोकांची असली तरी काही वर्षांनी त्याला आर्थिक पाठबळ हे विनोद दोशी यांच्या पत्नी सरयू आणि त्यांच्या कुटुंबाकडून मिळाले.

विनोद दोशी हे उद्योग जगतातील खूपच मोठं नाव.91 साली आर्थिक उदात्तीकरण झाल्यावर अनेक नवे व्यवसाय, व्यवसायतील नावं पुढे आली. पण भारतातील उद्योग जगतात टाटा, बिरला, गोदरेज सारख्या काही 'घराण्यांचा' समावेश आहे.संगीतात जशी घराणी आहेत, तशी उद्योग जगातातली ही घरणीच!त्यात वालचंद हे एक. साखरेपासून मोटार गाडीपर्यन्त त्यांच्या व्यवसायचा पसारा! या अशा घरण्या मध्येच विनोद दोशींचा जन्म झाला. आधीपासूनच त्यांना कलेबद्दल प्रचंड आस्था!मुख्य म्हणजे उद्योग सोडूनही एक वेगळ जग अस्तित्वात आहे याची त्यांना जाणीव होती. हे फार महत्वाचं आहे.
सुदैवाने त्यांच्या पत्नीलाही कलेबद्दल विशेष ओढ़ होती.आणि ही आवड त्यांनी फक्त कला पाहण्यापुरती मार्यादित ठेवली नाही.विनोद आणि सरयू दोशींनी त्यांचं राहतं घर कलाकरांसाठी अक्षरशः चोवीस तास उघडं ठेवलं होतं. त्यांच्याकडे तेंडुलकर,दुबेजी,कर्नाड हे वरचेवर असायचे.त्याच बरोबर संगीत आणि सिनेमा क्षेत्रातलीही लोकं असायची. त्यांच्या घरामध्येच ते अनेक प्रयोगांचं, कार्यक्रमांचं आयोजन करायचे!त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना आर्थिक पाठबळही दिलं.खऱ्या अर्थाने त्यांनी कलेची आराधना केली.
आता अनेक उद्योगपती उदयास येत आहेत.जगातल्या आघाडीच्या महसत्तांमध्ये भारताची गणना केली जातिये. पण आता कलेबद्दलची असणारी लोकांची आस्था कमी होताना दिसतीये.उद्योजग कलेमध्ये गुंतवणूक करू पाहतयेत.'गुंतवणूक' म्हंटलं की त्यातून होणाऱ्या 'फायद्याकडे' आपसुक लक्ष जातं.आणि जर या क्षेत्रात असा ऊट - सूट फायदा होत असता तर....
ही मागणी कदाचित अवास्तव वाटत असेल, पण कला क्षेत्राला प्रोत्साहन द्यायला अशा माणसांची गरज आहे.आणि हे फक्त आपल्या देशापुरतं मर्यादित नाहिये. जगभरात फार पूर्वीपासून राजे-महाराजे आपल्या संस्थानात कलाकरांना प्रोत्साहन द्यायचे.त्यामुळेच तर कितीतरी महान गायक,चित्रकार,लेखक ई. या जगाला मिळाले!हे पाठबळ मिळालं नसतं तर?एखादी कलाकृती पाहिले मनात बनते, मग तिला योग्य दिशा मिळाली की वस्तुस्थितीत उतरते.नुसत्या पैश्यांच्या विचारांनी मन वेढलं तर तितकी चांगली, मनापासून केलेली, पवित्र कलाकृती बघायला मिळणार नाही.
कला आणि त्याचं अर्थकारण याचा मेळ बसणं अवघड नाही, तर अशक्य आहे!म्हणजे उदाहरण म्हणून भीमसेन जोशींच्या एका गाण्याची किम्मत कशी ठरवणार?मैफिलिच्या तिकीटाएवढी त्याची किम्मत आहे का?की कॅसेटच्या किमतीएवढी?मग त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची, आनंदाची किम्मत?ती कशात तोलणार?या अशा महान कलाकरांमुळे कधीतरी आयुष्य समृद्ध झालं न?निदान ते समृद्ध झाल्याचा भास तरी झाला असेल!मग जर भीमसेनजी गायलेच नसते कधी, किंवा त्यांचं गाणं लोकंसमोर आलंच नसतं तर आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत फरक नक्की पडला असता!जसे हे कलाकार महात्वाचे तसेच त्यांचे संगोपन करणारे लोकंही महत्वाचे असतात.

देशाला, जगाला आणि एका अर्थाने आपल्याला, अशा अनेक विनोद आणि सरयूंची गरज आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा