८.३.१५

नाटकवाल्याच्या प्रयोगांशी ओळख


परवा अतुल पेठेंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.’ नाटकवाल्याचे प्रयोगअसं अगदी योग्य नाव. नाटक करायला लागल्यापासून मी पेठेंना ओळखतोय. सुरुवातीला ते फक्त एक नाव होतं.मग त्यांची नाटकं पाहिली, त्यांनी केलेले माहितीपट पाहिले. आता काही वर्षांपासून त्यांची मुलगी पर्ण ही आमची जवळची मैत्रिण झाली आहे. एकसक्षम अभिनेत्री म्हणून नावारूपाला येत आहे. माझ्या काही नाटकांमध्येही तिने भूमिकाही केल्या आहेत. त्यामुळेही पेठेंशी ओळख वाढली आहे, संवाद वाढला आहे. एका नाटकाची तालीम करायला जागा नव्हती तर त्यांनी सरळ त्यांचं राहतं घर उपलब्ध करून दिलं!

त्यांच्या या अशा स्वभावामुळेच की काय, त्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी होती.फेब्रुआरी महिना असला तरी या कार्यक्रमाला पावसाने पण हजेरी लावली. हे फारच अलंकारिक झालं, त्यांना कदाचित हे वाक्य आवडणार नाही. असो! तरया कार्यक्रमाला भरपूर गर्दी झाली होती याचाच अर्थ फक्त नाटकवाले आले नव्हते. नाहीतर अर्ध्या सभागृहापेक्षा कमी लोकं असली असती. पेठेंचं काम हे नाटकपुरतं मर्यादित नाहीये, हे तर नाटकातून समाजप्रबोधन करायचं पण आहे.

हे त्यांच्या अनेक नाटकांतून दिसतंच. त्या त्या लोकांच्यात जाऊन, त्यांचे प्रश्न ओळखून, त्यांना घेऊन नाटक करणारे आपल्याला किती माहिती आहेत?बरं फक्त इतकंच नव्हे, तर प्रसिद्धीची हाव कुठेही दिसत नाही.नाटक हे नाटक म्हणून करतात.आणि ते सातत्याने करतात!त्याची आर्थिक गणितं मग कशी सोडवायची याचा विचार प्रयोगागणिक केला जातो.दाभोलकर हत्याकांड झाल्यावर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना वाईट वाटलं.पण पेठेंनी ती भावना कृतीत उतरवली आणि त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनचा संदेश देणाऱ्या अनेक नाटकांच्या प्रयोगांचा एक कार्यक्रम बांधला आणि तो यशस्वीही करून दाखवला!पेठेंचे जे एसएमएस येतात त्यात शेवटी अनेकदालॉंग लिव्ह थिएटरअसंही लिहिलं असतं.

तर, जे अनेक मान्यवर लोकं तिकडे उपस्थित होते, त्यांनी जी भाषणं केली, त्यामध्येचळवळ हा शब्द प्रामुख्याने वापरला जात होता. ते ऐकता ऐकता मला जाणवलं की नाटक करायची इच्छा असण्यामागचं कारण किती वेगळं आहे!कोणती चळवळ?मला का नाही अशा कुठल्या चळवळीचा भाग व्हावासा वाटत?मी एक कलाकार म्हणून कमी पडतोय का?या प्रश्नांनी मला वेढलं आणि काही वेळाने लक्षात आलं की हे प्रश्न, हे विचार पण केवढे स्वार्थी आहेत. ‘ मी  कलाकार म्हणून कमी पडतोय का?’ यात फक्त माझाच विचार आहे.या कारणाने जर कोणत्याही चळवळीत सहभागी व्हायचं म्हंटलं तर माझा स्त्रोतच चुकला आहे! दुबेजींचे शब्द आठवले, ‘मोटीव्ह!मोटीव्ह काय आहे बाबा?त्या पात्राचं मोटीव्ह काय आहे?तो का एंट्री घेत आहे स्टेजवर?त्याचा बिफोर काय आहे?’

यामुळे एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून स्वतःची पडताळणी करायला मिळाली.माझा मोटीव्ह काय आहे?मी जे करतोय ते का करतोय?माझा बिफोर काय आहे? कोणत्या गोष्टीबद्दल आपल्याला आतून वाटतं?काय बोचतं?कशाबद्दल आर्ततेने बोलावसं वाटतं?ती आर्तता खरी आहे का?की समाजमान्यता मिळावी म्हणून उसनी आणली आहे?

माझा जन्मा ऐंशीचं दशक संपतानाचा. ९१ सालचं आर्थिक उदारीकरण झाल्याचं मला आठवत नाही. त्याचे परिणाम फक्त भोगले. पण नेमकाबदल काय झाला जाणवलं  नाही.कारण आधीचं काही माहिती नव्हतं.त्यामुळेझपाट्याने बदललेला मध्यमवर्ग फारसा माहिती नाही.मंडल आयोगाच्या आधीचा काळ काय होता माहिती नाही.जे बघत आलोय ते त्याच्या नंतरचंच आहे. गांधीवादाचा विजय झालेला बातम्यांमध्ये कधी वाचलं नाही.ते फक्त एका चित्रपटात पाहिलं.त्यात पण प्रमुख भूमिका संजय दत्तची होती.

काही वर्षांपूर्वी एका मित्राच्या वडिलांशी बोलत होतो. ते मला सांगत होते की मुंबईमध्ये ते असताना एका बस-स्टॉपला थांबले होते.त्यांच्या शेजारी सी.डी.देशमुख उभे होते. सी.डी.देशमुख म्हणजे भारताचे एकेकाळी वित्त मंत्री होते आणि पाहिले भारतीय होते ज्यांची नियुक्ती रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर म्हणून करण्यात आली.ते ऐकून मला फारच आश्चर्य वाटलं. मी आत्तापर्यंत फक्त अशा कहाण्या ऐकल्या होत्या की अमुक अमुक देशाचे राष्ट्रपती सायकलीवरून ऑफिसला जातात, किंवा सर्वसामान्यांसारखे ट्रेनने जातात वगैरे वगैरे. भारतात पण असं एक उदाहरण आहे हे ऐकून आश्चर्य वाटलं.तेव्हा त्यांच्याशी बोलता बोलता म्हणालो की मला तरी कोणताही नेता, हा 'नेता' वाटत नाही. त्याची भक्ती करावी, निदान अनुकरण करावं असं वाटत नाही. तसंच अमेरिकेतल्या काही लोकांशी संवाद करत होतो तेव्हा जाणवलं की त्यांची एक राजकीय भूमिका होती. मग मला कोणतीही भूमिका का घ्यावीशी वाटत नव्हती?विचार केल्यावर लक्षात आलं की आता राजकीय विचारसरणी वगैरे काही उरलं नाहीये.ज्यांची सत्ता आहे, त्या पक्षात अनेक लोकं जातात.सामाजिक मुद्द्यांचं फक्त राजकारण केलं जातं, आणि आता तेराजकारणात असंच असतं म्हणून स्वीकारलं आणि गौरवलंही जातं.आर्थिक भ्रष्टाचारापासून क्वचितच कोणी वाचलं असेल, पण हा वैचारिक भ्रष्टाचार खूपच वाईट!तो आता सगळ्यांमध्ये भिनला आहे.

हे सगळं मला त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाऊन जास्त प्रकर्षाने जाणवलं. पण मग याचा अर्थ आता मला कधी काही जाणवणार नाही आणि त्यामुळे मी ते व्यक्त करू शकणार नाही असा होतो का?असं काही काळ मला खरंच वाटून गेलं.पण हळू-हळू एक कळत गेलं की आपल्या जाणीवा आपण व्यक्त करत असतो.त्यांनी हे फार जवळून पाहिलं असणार.आणि माणसमाणसात फरक असणं अपरिहार्य आहे. त्यांचं पुस्तक वाचून, काम पाहून प्रेरणा घेतली पाहिजे.ते सगळं पाहून, ऐकून आपणच बुजलो तर कसं चालेल?त्यांनाही ते चालणार नाही.कोणत्याही कलाकाराचं काम पाहून त्यातले चांगले गुण उचलले पाहिजेत आणि आपल्यातले, आपल्या कलेतले दोष घालवले पाहिजेत. जाणीवा आपल्या जगण्याप्रमाणे बदलत राहणार. नवनवीन अनुभव येत राहणार. ते मनाशी ठेवून आपली कला अधिकाधिक प्रगल्भ करत जाणं इतकंच आपल्या हातात आहे.

जे आजू-बाजूला घडत आहे, ते डोळसपणे बघून, त्यामध्ये जे खरंच आतून वाटत आहे त्यावर नाटक किंवा कोणतीही कलाकृती करणं गरजेचं आहे.वैचारिक भ्रष्टाचारावर मात  करत, आजू-बाजूच्या कोलाहालात आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे पेठेन्प्रमाणे प्रामाणिकपणे स्वीकारणं फार गरजेचं आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा