१४.६.१५

नमस्कार! मला नट व्हायचंय…

काही वर्षांपासून अनेक फोन येतात, फेसबुक वर वगैरे मेसेज येतात - 'मला नाटकात घ्या.' किंवा 'मला नट व्हायचंय'! याहून भारी म्हणजे असंही म्हणणारी लोकं भेटतात - 'सध्या जरा वेळ फ्री आहे. जरा ३ महिने काम कमी आहे. या तीन महिन्यात कुठलं नाटक करता येईल का?' किंवा 'नोकरी शोधतोय, ती मिळेपर्यंत करतो काहीतरी तुमच्याबरोबर'.

या लोकांना काय म्हणायचं हेच काळत नाही!कसं सांगायचं?तुमची सुरुवात, तुमच्या विचारांचा, इच्छेचा उगमच चुकीचा आहे!अभिनय काय ३ महिन्यात येणारी गोष्ट आहे का?किंवा नाटक काय तुम्ही फ्री आहात म्हणून करायचं?मग कसे टिकणार तुम्ही इथे?आणि हीच सुरुवातीला तुमची निष्ठा असेल तर पुढे जाऊन काय कराल?आणि अभिनय करणं इतकं सोप्पं वाटतं का?घरी बसून, जेवत जेवत समोरच्याला टी.वी. वर अभिनय करताना बघून, सगळंच सोप्पं वाटतं. आपण नाही का क्रिकेट खेळाडूंना शिव्या घालत जेव्हा ते हरतात?तसंच काहीसं.

याच विचारांमध्ये होतो आणि मला नाटकाची कार्यशाळा घ्यायला बोलावलं. मी ही लगेच 'हो' म्हणालो. कारण यानिमित्ताने मी जे काही शिकलो ते पुन्हा शिकायला मिळेल. कोणालातरी काहीतरी सांगायचं म्हणजे आपला अभ्यास चोख पाहिजे!आणि या कार्यशाळेच्या निमित्ताने तो अभ्यास पुन्हा करायला मिळेल. मी सत्यदेव दुबेंना माझा गुरु मानतो. त्यांची एक कार्यशाळा १० वर्षांपूर्वी केली होती. आणि त्यानंतर या न त्या कारणाने पुढची ७ वर्ष त्यांच्याबरोबर भेटी होत होत्या, चर्चा होत होती. या  कार्यशाळेत त्यांच्याकडून जे शिकलो ते मुख्यतः शिकवायचं असा निश्चय केला आणि तयारीला लागलो. त्यांची कार्यशाळा सुरु करायच्या आधी दुबेजी काही लेख आणि कविता द्यायचे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याचं ते सगळं तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच! काही लेख आणि कविता शोधू लागलो पण एक लेख मला काही केल्या सापडेना. दुबेजींनी स्वतः तो लिहिला होता. शेवटी इकडे-तिकडे चौकशी केली आणि तो सापडला! तो वाचल्यावर आपसूक डोळ्यात पाणी आलं. त्यांनी जे फार पूर्वी लिहिलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे असं वाटलं.

दुबेजींवर जितकं लिहावं तितकं कमीच आहे. तरी त्यांच्यवर एखाद-दुसरा लेख लिहीनच. पण हा लेख मुख्यतः त्यांनी मांडलेला, साधा, सरळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरा विचार, यावर आहे. नट-नटी व्हायचं म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं हे लोकांना कळेल. फक्त संवाद माहिती असणं आणि ते चार चौघांमध्ये म्हणता येतात इतकं पुरेसं नाहीये!त्याला जी तपश्चर्या लागते, याचं महत्त्व हा लेख सांगतो. आणि फक्त तिथे थांबत नाही. तर यश-अपयशासाठी काय काय गरजेचं आहे हे ही सांगतो.

हा त्यांचा विचार मी येत्या कार्यशाळेत सर्वांपर्यंत पोहोचवू शकलो तरी थोड्या-फार प्रमाणात यशस्वी झालो असं समजेन.


हा तो लेख -

‘आज हिंदुस्तान का हर नौजवान ऐक्टर बनना चाहता है पर यह इसे कौन बताएगा कि ऐक्टर बनना हर किसी के बस कि बात नही कौन समझाएगा उसे कि ऐक्टर बनने के लिए प्रतिभा जरूरी है, टॅलेंट रूप रंग चाहे कितना भी अच्छा हो प्रतिभा के बगैर कोई ऐक्टर नही बन सकतारूप रंग है प्रतिभा है तो भी जी तोड़ मेहनत करनी पड़ती है ऐक्टर बनने के लिए जी तोड़ मेहनत के बाद भी बुलंद तकदीर लगती है स्टार बनने के लिए अगर तकदीर ने साथ दिया और आप स्टार बन भी गए, तब भी स्टार बने रहने के लिए और भी कड़ी मेहनत करनी पड़ती है याने कड़ी मेहनत से छुटकारा नही इतना ही नही यह भी समझना पड़ेगा कि कड़ी मेहनत किस दिशा में करनी चाहिए नाच सकना आज एक अहम जरूरत है पर क्या ताल पर आपका बदन थिरकता है क्या ताल रो ताल मिला सकते है आप प्ले बॅक नाम की चीज आज जरूर है पर क्या आप पर्दे पर आभास पैदा कर सकते है कि आप ही है जो गाना गा रहे है फिर जो उछल कूद,उठापटक,मुक्केबाजी आप पर्दे पर देखते है आपके बस की बात है क्या?अपनी जिंदगी में आप यह सारा कुछ आसानी से कर लेते है लेकिन पर्दे पर करने के लिए आपको वही चीज दोबारा सीखनी पड़ेगी आप जो कुछ भी अपनी जिंदगी में आसानी से कर लेते है - साफ बोलना, मुस्कुराना, दूसरे तक अपनी बात पहुँचा पाना, रोना, गुस्सा होना, डरना-डराना यह सब नये सिरे से सीखना होगा और इस का ख्याल रखना होगा कि यह सारा कुछ स्वाभाविक दिखे - नैचरल दिखे यह जो सारा कुछ उपर लिखा है इसे पूरी तरह याद कर लो फिर कम से कम दो सौ मर्तबे इसे बोलो - जोर से आईने के सामने के अपनी नजर से नजर मिलाकर - यकीन मानो यह एक अच्छी शुरुआत होगी - बेस्ट ऑफ़ लक

पं. सत्यदेव दुबे





नाटक बघताना रिटर्न्स!

मागच्या एका लेखात, नाट्यसंस्कारांविषयी बोललो होतो. म्हणजे नाटक पाहतना प्रेक्षकांची वर्तणूक कशी असावी यावर. या सदरातले लेख कोण-कोणत्या विषयवार असावे हा जेव्हा अगदी सुरुवातीला विचार करत होतो तेव्हा मनात पहिल्या पहिल्या आलेल्या विषयांपैकी हा एक. तो खरं नीट विचार करुन, 'काय करायला हवे' या मुद्द्यावर लिहायचा होता. पण 'मिस्टर अँड मिसेस' च्या बाबतीत ती घटना घडली आणि तात्काळ 'काय करू नये' अशा अंगाने तो उत्स्फुर्तपणे लिहिला गेला.
नाटक पाहण्याच्या प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीपासून आरम्भ करुयात. सध्या अनेक नाटकांना फोन बुकिंगची सोय असते. प्रेक्षक आणि नाट्यनिर्माते, दोघांच्या हिताची ही गोष्ट. प्रेक्षकांची केवळ टिकिट विकत घेण्याची एक खेप वाचते, आणि नाट्यनिर्मात्यांना एक आश्वासन मिळते की इतके इतके तरी प्रेक्षक येणार आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की प्रयोगच्या दिवशी प्रेक्षक नाटयगृहाला उशिरा, किंवा अगदी ऐनवेळी पोचतात. किंवा पोहोचतच नाहीत. त्यामुळे ती टिकीटे एकतर वाया जातात किंवा ऐनवेळी दुसऱ्या एखाद्या प्रेक्षकाला विकली जातात. ही गैरसोय टाळण्यासाठी, सर्वात महत्वाचं म्हणजे नाट्यगृहाला प्रयोगच्या किमान अर्धा ते पाऊण तास आधी पोहोचावं. जर शक्य नसेल तर तसे फोन करून कळवून आश्वासन द्यावं आणि मुख्य म्हणजे ते पाळावं! जर नाटकाला यायला जमणार नसेल याची खात्री असेल तर ते लवकरात लवकर कळवावं.
एकदा टिकिट मिळालं की पहिली घंटा झाली की जाऊन आपल्या जागेवर बसावं. नाटक बघणं हा अनुभव असतो, आणि या अनुभवाची सुरुवात त्या नाटकाचा प्रयोग सुरु व्हायच्या आधी, तिकड्या वातावरणामुळे सुरु होते. तिसऱ्या घंटेनंतर अनेक प्रेक्षक येतात. त्यामुळे ते तर सुरुवातीपासून अनुभव घेत नाहीत ही गोष्ट वेगळीच, पण ते स्थानापन्न होईपर्यंत इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो. आणि कलाकरांचा तर होतोच होतो. आपल्याकडे चित्रपट संस्कृती आणि नाटक संस्कृतीमध्ये काही भेद नाही हे जाणवतं. पण नाटकामध्ये समोर रंगमंचावर खरे - खुरे, हाडामासाचे कलाकार त्याक्षणी आपली कला सादर करत असतात याचे भान प्रेक्षकांनी ठेवले पाहिजे, आणि त्याचा आदरही केला पाहिजे.
अनेक ठिकाणी तिसऱ्या घंटेनंतर प्रवेश बंद करण्यात येतो. ही प्रथा पाडणं, अशी शिस्त लावणं अत्यंत गरजेची आहे.
प्रयोगच्या दरम्यान आपल्यामुळे कोणाचाही रसभंग होऊ नये ही जबाबदारी प्रत्येक प्रेक्षकाची आहे. अनेक लोकं प्रयोग सुरु असताना आपापसात बोलतात, मोठ्यांदा कॉमेंट करतात. लहान मुलं दंगा करतात. यामध्ये लहान मुलांचा काय दोष?त्यांच्या आई-वडिलांना कळलं पाहिजे. लहान मुलांना बऱ्याचदा घरी एकटं सोडणं शक्य नसतं, मान्य आहे. पण जर त्यांना नाटकाला आणायचंच असेल, तर 'क्राय रूम' मधून नाटक पाहण्याची एका पालकाने तयारी ठेवावी. बऱ्याचदा हा अनुभव येतो की अगदी इतर प्रेक्षकांनी तक्रार करेपर्यंत रडणाऱ्या मुलाचे पालक कोणतंही पाऊल उचलत नाहीत. हा झाला अगदीच लहान बाळांचा मुद्दा. मोठ्या मुलांना तर त्यांच्या पालकांनी सांभाळलंच पाहिजे! 'मला नाटक बघायचं आहे, मुलांनी प्रेक्षागृहात काहीही करावं' असा विचार आणि कृती दोन्ही चुकीचं आहे!
मोबाईल फोनबद्दल बोलायची गरज तरी आहे का?म्हणजे, गरज आहे.नक्कीच आहे.पण अजून काय आणि किती बोलायचं याबद्दल?तो बंद करता येणार नसेल, तर निदान सायलेंटवर करावा हे का कळत नाही लोकांना?हा प्रश्न तर फारच सतावतो.फोन वाजतोच कसा?काही निर्मात्यांनी स्वखर्चाने मोबाईल जॅमर पण आणले आहेत. पण त्यांचा वापर होऊ नये या मताचा मी आहे. कारण प्रेक्षकांमध्ये एखादा डॉक्टर असू शकतो ज्याला कधीही बोलावणं येऊ शकतं.किंवा कुठल्याही प्रेक्षकाच्या कुटुम्बाला त्यांची तात्काळ गरज भासू शकते. किंवा इतर काही.... पण तरी याचा त्रास इतरांना होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतलीच पाहिजे.
मध्यांतरामध्ये अनेक प्रेक्षक कलाकरांना भेटायला, गप्पा मारायला, फ़ोटो काढायला येतात. मध्यांतर हा जितका प्रेक्षकांसाठी असतो, तितकाच कलाकरांसाठी पण असतो याचं भान असलं पाहिजे.त्यांना थोड़ी विश्रांती मिळावी, पुढच्या अंकाची तयारी करावी यासाठी असतो. अनेक प्रेक्षक तर मध्यांतरात येऊन कलाकराच्या कामबद्दल, नाटकाबद्दल प्रतिक्रिया पण देऊन जातात! त्यामुळ कलाकरचं लक्ष विचलितही होऊ शकतं! प्रेक्षकांना भेटणे, त्यांचे कौतुक करणे, त्यांच्यावर टीका करणे, हे प्रयोगानंतरही होऊ शकतं.आणि ते तेव्हाच व्हावं!
राहता राहतो एकच महत्वाचा मुद्दा - स्वच्छता!जवळ जवळ सगळ्याच नाट्यगृहांमध्ये खाद्य - पेयांना बंदी असते.पण ती कोणीही जुमानत नाही.व्यवस्थापनला पण ते थांबवता येत नाही. प्रेक्षागृहात खाणे टाळावे. नंतर 'उंदीर होतात' वगैरे तक्रारी आपणच करतो. व्यवस्थापनाने स्वच्छता राखावी हा पुढचा मुद्दा आहे. शक्यतो कचरा करुच नये. आणि झालाच तर तो कचरापेटीशिवाय दुसरीकडे कुठेही टाकू नये याची काळजी घ्यावी. गुटखा, पान, तंबाकू खाऊन थुंकण्याविषयी बोलायची अजिबातच गरज नाही.
असो..तर या सगळ्या प्रयोगाला येताना लक्षात ठेवायच्या गोष्टी.तसं पाहिलंत तर अत्यंत साध्या आणि सोप्प्या गोष्टी आहेत. कुठेही वायफळ अशी अपेक्षा नाही. ही थोड़ी शिस्त पाळली गेली तर नाटकाचा आनंद कितीतरी पटीने वाढेल यात शंका नाही!
हा कदाचित लेख कमी, आणि प्रबोधनकारक निबंध वाटला असेल.किंवा 'यात काय नवीन?हे तर सगळं आम्ही करतोच' असंही वाटलं असेल. जर करत असाल तर चांगलंच आहे!पण नसाल तर हे जरूर आमलात आणावं अशी मी या लेखाद्वारे कळकळीची विनंती करतो!



कथेचं नाटक करताना..

काही महिन्यांपूर्वी गिरीश कर्नाडांच्या एका व्याख्यानाला गेलो होतो. नाटक कसे लिहावे असा साधारण विषय होता. बोलता बोलता त्यांनी त्यांच्या अनेक नाटकांची उदाहरणे दिली, मुख्यतः 'ययाती' चे नाट्यरुपांतर त्यांनी कसे केले यावर ते बोलले. ते ऐकून मी केलेल्या नाट्यरुपांतरांची आठवण झाली. कर्नाडांची आणि माझी तुलना अजिबातच होऊ शकत नाही. माझाही तसा कोणताही गैरसमज नाही. पण स्वतःच्या कामाविषयी मी जास्ती अधिकाराने बोलू शकेन म्हणून माझ्या नाटकांची उदाहरणे देऊन बोलेन, बाकी काही नाही.

मी मुख्यतः कथांची नाट्यरूपांतरं केली आहेत. 'रारंगढांग' या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचे एका ध्वनीपुस्तकात (Audio book) रुपांतर करण्यासाठी संहिता लिहिली. आणि आपल्या पारंपारिक पाच अंकी संगीत नाटकांचे दोन अंकात संकलन केले. त्यामध्येही माझ्यातल्या लेखकाचा कस लागला होता. पण आता मी नाट्यरुपांतरं  केलेल्या पहिल्या तीन कथांवर लक्ष केंद्रित करेन कारण तिन्ही नाटके वेगळ्या ढंगाची होती. आणि प्रत्येकाची नाट्यरुपांतरणाची प्रक्रिया वेगळी होती. पहिली म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांची 'सायकल', दुसरी म्हणजे एका दिवाळी अंकात छापून आलेली, उमाकांत घाटे यांच्या 'तीर्थरूप बाबांस' ही.  या कथेचे 'बापजन्म' या नावाने  नाट्यरुपांतर केलं.  आणि तिसरी म्हणजे . मा. मिरासदार यांनी लिहिलेली 'दळण'. प्रत्येक कथेचा (किंवा मूळ साहित्याचा) बाज ओळखून, त्यामध्ये जे योग्य वाटले ते बदल करून त्याचं नाट्यरुपांतर कसं केलं हे आपण पाहूयात.

) सायकल

सायकलची कथा अत्यंत साधी आणि सुंदर आहे. त्यामुळेच ती मनाला चटकन भावते आणि ते जग आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. एका गरीब शिक्षकाने आपल्या मुलाला अमुक अमुक मार्क पाडले की बक्षीस म्हणून सायकल कबूल केलेली असते. जवळ जवळ तीन वर्ष तो कबूल करत असतो, आणि मुलगा मार्क मिळवत असतो. पण गरिबीमुळे मास्तर ती घेऊ शकत नसतो आणि त्याला याची जाणीव असते. शेवटी तो एक सेकंड हँड सायकल विकत घेतोच आणि त्याला कळतं की त्या सायकलीवरून पडून त्याच्याच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा धक्का तो कसं पचवतो आणि त्या सायकलीचं आणि त्याच्या मुलाचं पुढे काय होतं अशी ही कथा आहे.
ही कथा वाचल्या वाचल्या त्यातले सहा मुख्य दृश्ये दिसली - अ) त्यांच्या मुलाला पुन्हा चांगले मार्क मिळाले आहेत ब) मास्तर सायकलवाल्याकडे जातात आणि एकदाची सायकल घेऊन टाकतात क) घरी येऊन ती मुलाला भेट देतात ड) त्यांना सायकलचा इतिहास कळतो ई)ते सायकलवाल्याकडे जाऊन खात्री करतात फ)आणि घरी आल्यावर शेवट.
यामध्ये अनेक वर्णनं आहेत.पण मुख्यतः मास्तरांची घालमेल, त्यांचे मनातले विचार हे मांडून दाखवले आहेत. आता हे नाटकात आणायचे कसे?त्यांचे लांबच्या लांब मोनोलॉग तर असू शकत नाहीत. मग कथाकथन आणि नाटकात फरक तो काय?मग त्यांचा मित्र आणायचा का ज्याच्यापाशी मास्तर मन मोकळं करत असतील?पण अडचण तीच होती - मित्राला 'आणायला' लागलं असतं!मग त्यापेक्षा शाळेतला शिपाई का नको?शिवाय जर आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा शिपायाने जर धीर दिला तर? मास्तरवर एक सुप्त दडपण पण येईल.कदाचित त्यामुळे, तीन वर्ष सायकल घ्यायची टाळाटाळ करत असलेला मास्तर आज बार उडवेल.
विकत घेतलेल्या सायकलचा इतिहास कळल्यावर तो कोणापाशी व्यक्त होईल?मनात जे विचार चालले आहेत, प्रचंड घालमेल सुरु आहे, ती अव्यक्त राहिली तर प्रेक्षकांवर कमी प्रभाव पडेल. पण सांगणार कोणाला?आणि कसं?त्यामुळे सायकलवाल्याकडे खात्री झाल्या झाल्या त्याच्या वर्गातला एक मुलगा बरोबर त्याच्यासमोर येऊन सायकलीवरून पडतो. ते पाहून, त्या मुलावर तो राग व्यक्त करतो आणि भडा भडा बोलतो. एरवी शांत, बुजरा असलेल्या मास्तरचा हा आवेश त्यामुळे ओढून ताणून आणल्यासारखा वाटत नाही.  त्यात, अगदी सुरुवातीलाच नेमके शब्द असलेले संवाद वापरायचे असं मी ठरवलंच होतं. शब्दबंबाळ न होऊ देता, कथेचा अनुभव कसा पोहोचवता येईल याकडे लक्ष दिलं. त्यामुळे प्रत्येक दृश्यात तो मूड तयार होण्यासाठी विविध आवाजांचा वापर केला. शाळेत खराब झालेल्या पंख्याचा आवज. हा सुरुवातीला त्रास देत नाही, पण जेव्हा त्याला सायकलमुळे झालेल्या मृत्यूबद्दल कळतं तेव्हाच तोच आवाज अंगावर येतो. हे आणि असे अनेक निर्णय होते. हे दिग्दर्शकीय कमी आणि नाट्यरूपांतरादरम्यान घेतलेले निर्णय जास्त होते हे मी खात्रीशीर सांगू शकतो.



शाळेतला शिपाई


शाळेतला विद्यार्थी मास्तरांसमोर सायकलवरून पडतो 

२) बापजन्म

'तीर्थरूप बाबांस' ही कथा एका पत्राच्या रूपात आहे.मुलाने आपल्या परागंदा झालेल्या वडिलांना लिहिलेलं पत्र. ते पळून गेल्यानंतर तो,त्याची आई आणि बहीण कसे जगले याचं त्यात वर्णन केलं आहे.मुळात पाहता हा काही नाटकाचा विषय नव्हता. पण मला ती कथा इतकी आवडली होती की मला काहीही करून त्याचं काहीतरी करायचं होतं. मग अनेक प्रसंग, दृश्ये डोळ्यासमोर उभी राहिली - लहान मुलाचे वडील पळून गेले, मामाकडे घालवलेले दिवस, त्याचं शिक्षण - इत्यादी इत्यादी. पण या सगळ्यामध्ये 'नाट्य' सापडत नव्हतं. मग विचार केला की या मुलाच्या पात्राला अनेक वर्षांनी त्याचे वडील एकदम भेटले तर?या प्रसंगात तर नाट्यच नाट्य होतं!आणि हा प्रसंग म्हणजेच संपूर्ण नाटक झालं. एका मुलामध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये १६ वर्षांनंतर झालेला संवाद. यामध्येही सुरुवातीला अगदी कमी संवाद वापरले. त्या दोघांमध्ये असलेलं टेन्शन हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या दोघांमधली अस्वस्थ शांतता खूप काही सांगून जात होती.
आणि नाटक सुरु झाल्या झाल्या हे दोघं कोण आहेत, इकडे का आहेत हे कळलंच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?नाटक संपल्यावर दोघांच्यातलं नातं कळतंय न?प्रेक्षकांच्या मनात कोणती शंका उरत नाही न?मग झालं तर!

३)दळण

मिरासदारांच्या कथेचं नाट्यरुपांतर सर्वात अवघड होतं!एक तर तद्दन विनोदी कथा!तो बाज सुटू न देता ते रंगमंचावर आणणं गरजेचं होतं. गावात आलेल्या नवीन मास्तर इतका रंगेल असतो की त्याला त्याच्या विद्यार्थ्यांकडे बघून समजत असतं की त्यांची आई रूपवती असेल की नाही. वर्गातल्या देखण्या पोराला हेरून, त्याची आणि आईची भेट घडवतोच आणि तिचा नवरा फिरतीवर आहे हे समजल्यावर, तिच्या घरी रात्री भेट द्यायचीच असं निश्चित करतो. तिकडे गेल्यावर काय काय घडतं याचा कथेच्या नावावरून अंदाज बांधता येइलच.
याचं नाट्यरुपांतर पारंपारिक पद्धतीने केलं - म्हणजे प्रसंग, मग काळोख, मग त्यात नेपथ्य बदलून पुढचा प्रसंग. असं अख्खं नाटक बसलं!हसू येत होतं, पण काही केल्या मनापासून मजा येत नव्हती. नेमकं काय होतंय हे समजत नव्हतं!मग एकदा अशी उपरती झाली की या नाटकाचा बाज हा कदाचित पारंपारिक नाटकासारखा नसला पाहिजे. दोन प्रसंगांच्या मध्यात असलेल्या वेळात कंटाळा येतोय आणि प्रेक्षकांचं मन विचलित होऊ शकतं. हे एकदा कळल्या कळल्या त्यामध्ये लगेच बदल करू लागलो. सर्वात महत्वाचं म्हणजे संगीत. यामध्ये मला अभय महाजनची मोलाची साथ मिळाली.रोहित निकमने अत्यंत मजेशीर गाणी लिहून घेतली, गंधार संगोराम ने सोप्प्या आणि सुंदर चाली दिल्या आणि ती गाणी कलाकारांच्या तोंडी बसवली. एक वगळता सगळे काळोख काढले आणि एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाण्याकरता गाण्यांचाच वापर केला. सगळे कलाकार गाता गाताच पुढच्या प्रसंगाचं नेपथ्य लावतात!प्रेक्षकांनी एक सेकंदही इतरत्र कोठेही पाहू नये आणि पूर्ण वेळ त्यांचं मनोरंजन होईल याची तजवीज घेतली. यामुळे नाटकाला एक ताजेपणाही आला. जवळ जवळ ८ वर्षांपूर्वी हे नाटक बसवलं आणि त्याचे प्रयोग अजूनही चालू आहेत!

अमेय वाघ एक प्रासंगिक गाणं सादर करताना

शाळेतली मुले गाताना