२८.१.१५

मी अनुभवत असलेली बदलणारी मराठी रंगभूमी


 माझा नाटकांशी संबंध जेम तेम १५ वर्षांपूर्वीपासूनचा. त्यात मी रंगकर्मी तर गेले १० वर्षच आहे. आता 'प्रायोगिक रंगभूमीवर की व्यावसायिक?' हा प्रश्न पडू शक्तो.पण  मी 'प्रायोगिक' किंवा 'व्यावसायिक' या बंधनात नाटकांना अडकवू पाहत नाही. नाटक हे नाटक असतं. तर १५ वर्षांपूर्वी नाटकाशी संबंध आला ते  'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाने. मी पाहिलेलं हे पहिलं नाटक. कै. लक्ष्मण देशपांडेंच्या सादरीकरणामुळे असेल किंवा त्या प्रयोगाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे असेल, मला 'नाटक' ही  कला बघण्याची चटक लागली आणि मग तेव्हा गाजत असलेली अनेक नाटकं पाहिली - 'एका लग्नाची गोष्टं', 'यदा कदाचित' किंवा भारत नाट्य मंदिरची ती अनेक पारंपारिक संगीत नाटके. काही खूप आवडायची, काही अजिबातच नाहीत. पण ते वेड लागलं होतं हे खरं!

एक-दोन वर्षांनी आई -बाबांनी मला एका नाटकाला नेलं. मी पण आनंदाने गेलो. पण त्या वेळेस आम्ही भारत किंवा टिळक किंवा अशा कुठल्याही मोठ्या रंगमंदिरात न जाता  एका अत्यंत छोट्या खोलीत गेलो! बाहेरून त्या इमारतीकडे पाहिल्यावर 'इकडे नाटक होतं' असं चुकूनसुद्धा वाटणार नाही, अशा इमारतीत ती खोली होती. 'सुदर्शन' रंगमंचावर  'समन्वय' या संस्थेचं विजय तेंडूलकर लिखित 'मसाज' या नाटकाचा प्रयोग होता. कॉनवेन्ट मध्ये असल्याने माझा तेंडुलकरांच्या लिखाणाशी अजिबातच संबंध नव्हता! त्यामुळे आई-बाबा जितके उत्सुक होते तितका मी मुळीच नव्हतो. 'मसाज' हे नाटक संदेश कुलकर्णीने बसवलं होतं आणि निखिल रत्नपारखी त्याचा एकपात्री प्रयोग करायचा. आता सुरुवातच 'वऱ्हाड ..' ने झाल्यामुळे एकपात्री नाटक बघायची जी काय उत्सुकता होती तीच.

खरं म्हटलं तर तिकडे पोहोचल्यावर मी बऱ्यापैकी हिरमुसून गेलो होतो. कारण इकडे 'नाटक' होऊ शकतं ही शक्यताच मनाने नाकारली होती.नाटक म्हणजे ८००-१००० लोकांसमोर मोठ्या नेपाथ्यामध्ये करायची गोष्टं असे संस्कार आधीच्या नाटकांमुळे झाले होते. पण पुढच्या ९० मिनिटात ते सगळं मोडून पडलं! नाटक म्हणजे फक्त हसवण्याचं साधन नसून ते एक अनुभव द्यायचं साधन आहे हे जाणवलं. पुढे एक दोन वर्ष नाटकांशी संबंध कमी आला, ९वी  १०वीच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं. पण एकदा ते संपल्यावर, महाविद्यालयात जेव्हा आलो, तेव्हा पुरुषोत्तम करंडका मुळे जो नाटकांशी संबंध आला तो काही केल्या तुटेल असं मला वाटत नाही!       

योगायोग म्हणजे 'समन्वय' कडूनच लगेच नाटक करायची संधी मिळाली! तेव्हा 'समन्वय', 'जागर', 'पीडीए', 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर' या संस्था पुण्यातून जोमाने कार्यरत होत्या. अतुल पेठे व मकरंद साठ्ये पण सामाजिक - राजकीय भाष्य करणारी नाटके करत होते.  तरी मराठी प्रायोगिक नाटकाचा केंद्रबिंदू म्हणजे मुंबईची 'आविष्कार' ही संस्था होती. चेतन दातार आणि काकडे  काका यांच्या नेतृत्वाखाली 'आविष्कार'ची  दर्जेदार नाटकं एका मागून एक येत होती. त्यात दुबेजी तिकडे एक मार्गदर्शक होतेच.

इकडे पुण्यातही 'आसक्त' नावारूपाला येत होती. मोहित टाकळकर सारखा वेगळ्याच जाणीवा असलेला आणि फारच चांगला aesthetic sense असलेला दिग्दर्शक त्याच्या नवीन नाटकांनी, सादरीकरणाच्या पद्धतीने आमच्यासारख्या नवख्या, होतकरू नाटकवाल्यांवर अप्रत्यक्षपणे संस्कार करत होता. 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर' मोहित बरोबर किंवा गिरीश जोशी बरोबर नाटकांची निर्मिती करत होते. यामुळे 'छोट्याश्या  सुट्टीत', 'फायनल ड्राफ्ट' ,'फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम', 'माकडाच्या हाती champgne' . नाटकं अक्षरशः एकामागून एक येत होती. 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर' ची 'ग्रिप्स'ची नाटकं पण वरचे वर सुरु होती. त्या नाटकांचा दरवर्षी एक महोत्सव व्हायचा.

थोडक्यात काय , तर सतत काही काही सुरु होतं!





काहीच वर्षात दीर्घ आजारानंतर चेतन दातार गेला. त्याच्या आजारामुळे व जाण्याने 'आविष्कार'चं कार्य बऱ्याच अंशी कमी झालं. त्याचबरोबर इकडे 'आसक्त' व 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर'  नाटकांमध्ये, नाटकांच्या विषयांमध्ये नव-नवीन प्रयोग करत होते. 'नाटक कंपनी' या आमच्यासारख्या तरुण रंगकर्मीची संस्था पण सुरु झाली. त्यामुळे हळू हळू पुणे हे मराठी प्रायोगिक नाटकाचं केंद्रबिंदू बनलं. पुण्याच्या नवीन नाटकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांचं आमंत्रण मिळू लागलं. महोत्सवांमधली इतर नाटकं पाहिल्याने रंगकर्मींच्या जाणिवा बदलू लागल्या. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांना रंगकर्मी जाऊ लागले. नाटकाचं प्रशिक्षण घेऊ लागले. हे शक्य झालं त्यामध्ये 'विनोद दोशी शिष्यवृत्ती'  आणि IFA चा ही मोठा वाटा आहे.

TV मुळे नाटक करणाऱ्यांची संख्या कमी होते आहे हे खरं आहे, पण त्यामुळे नाटक आणखी मनापासून होत आहे! कारण नाटक करणारे अत्यंत प्रेमाने आणि तन्मयतेने नाटक करतात. नाटक आणि चित्रपट असं समीकरण हळू हळू होऊ लागलं आहे. पण नाटक करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने एक महत्वाचा फरक झाला तो म्हणजे, आधी प्रत्येक संस्था हा एक वेगळा कंपू असल्यासारखा वाटायचा. एका संस्थेतला माणूस सहसा दुसऱ्या संस्थेचं काम करताना दिसायचा नाही. पण ते नक्कीच बदललंय. कदाचित गरजे मुळे असेल, पण आता कंपू शाही उरली नाही. 



सोशल मिडियामुळे जाहिरातीचं  तंत्र बदललं आहे. ज्याच्यापर्यंत जाहिरात पोचवायची असते ती त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोचते.आता फक्त सुदर्शन, भरतला अशा रंगमंदिरात  प्रयोग होत नाहीत तर वेगळ्या जागांमध्ये देखील होतात. त्यामुळेही नाटकातला ताजेपणा टिकून आहे.


कोणतीही कला ही हळू हळू बदलते, विकसित होते. काळानुसार 'evolve' होते. नाटक त्याला अपवाद नाही. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने गेल्या १० वर्षांचा आढावा घेतल्यामुळे हे बदल लक्षात आले. पुढे यात सकारात्मक बदल घडावेत म्हणून माझ्यासारखे अनेक रंगकर्मी कायम कार्यरत राहतील .